खासदार-आमदारांचे वाचन प्रेम : अरुण लाड म्हणतात, महापुरुषांच्या जीवनचरित्राचा, संतांच्या शिकवणुकीचा पगडा !
schedule07 Feb 25 person by visibility 138 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असताना कायम दौरे ठरलेले. पुणे, मुंबई प्रवास कायमचा. अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, बैठका यामुळे वाचनासाठी अनकेदा वेळ मिळत नाही. मात्र महापुरुषांचे चरित्र आणि संत साहित्य खुणावत असते. संतांचे जीवनकार्य समजावून घेण्याची ओढ स्वस्थ् बसवत नाही. मग मोटारीतच ते संत साहित्याचे वाचन, संताच्या जीवन कार्यावर आधारित ऑडिओ कॅसेट ऐकतात. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत साहित्य आणि वाचनाचे अन्य साधारण महत्व आहे. वाचनामुळे जगभरातील इथंभूत घटनांची माहिती कळते. ज्ञान मिळते. चांगले विचार अंगी रुजतात. यामुळे वाचन अत्यावश्यकच असल्याचे आमदार अरुण लाड यांनी स्पष्ट केले.
आमदार लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे मतदारसंघाचे कार्यक्षेत्र. मतदारसंघ विस्ताराने मोठा. यामुळे सतत दौरे. प्रवास. प्रवासात ते हमखास संतांचे जीवनचरित्र उलगडून सांगणारे ऑडिओ कॅसेट ऐकतात. अभंग, रचना, किर्तन, निरुपण याद्वारे संत साहित्याचे दर्शन घडते. सोबतीला महापुरुषांच्यावर आधारित साहित्य असते. महापुरुषांचे कार्य समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देते तर संत शिकवणही समाजहिताची. या दोन्हीचा मोठा पगडा पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांच्या व्यक्तिमत्वावर ठळकपणे आढळतो. यामुळे राजकारणासारख्या प्रांतात राहूनही लाड यांचे व्यक्तिमत्व आणि व्यवहार इतर राजकारण्यांपेक्षा भिन्न दिसते. एकीकडे सत्तेला प्राप्त झालेले महत्व आणि पदासाठी वाटेल ते करण्याची मानसिकता बळावत असताना दुसरीकडे लाड यांची शेती, सहकार, सामान्य माणूस, कष्टकरी समाजाशी नाळ घटट जुळलेली आहे. याचे सारे श्रेय क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी केलेले संस्कार, पक्की वैचारिक बैठक आणि संत साहित्यातून ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले….’या विचाराशी जुळलेली असल्याची भावना ते व्यक्त करतात.
आमदार लाड हे ७८ वर्षी आहेत. त्यांच्या दिनक्रमाला पहाटे पाच वाजता सुरुवात होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते नियमितपणे वर्तमानपत्र वाचतात. शेती, सहकार, शिक्षण, समाजकारण हे त्यांचे जिव्हाळयाचे विषय. साहजिकच या क्षेत्रातील घडामोडीत अधिक रस. शेतकऱ्यांशी निगडीत विषय, पदवीधरांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देतात. शेतमालाला भाव, तरुणांच्या हाताला काम यासाठी सक्षम धोरण असावे ही त्यांची भूमिका.
‘वाङमयीन प्रकार मग तो कोणताही असो, त्या माध्यमातून समाजाला चांगली शिकवण मिळत असते. संत साहित्यात तर संस्कार, समता, बंधुताचा संदेश शब्दांशब्दांत ठासून भरलेला. माणुसकीचा भाव, परोपकारी वृत्ती संताच्या जीवन आणि कार्यातून प्रकट होतो. महापुरुष, स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन तर त्याग, शौर्य आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देणारे. ’अशा शब्दांत आमदार लाड यांनी साहित्य आणि वाचनाचे महत्व अधोरेखित केले.