महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " स्वत:च्या विचाराने निर्णय घेताना इतरांच्या अनुभवाचाही आदर करा " असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
केआयटी अभियांत्रिक (स्वायत्त) महाविद्यालयाच्या ‘लीड इंडिया’ या विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीने शुक्रवार २ डिसेंबर २०२२ रोजी ‘संवाद- आयएएस अधिकाऱ्यांसोबत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून बलकवडे उपस्थित होत्या.
प्रशासकीय सेवेतील विविध अनुभव अशा मोठ्या पटलावरती ही मुलाखत घेण्यात आली.आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना जबाबदारीपूर्वक व कोणत्याही प्रकारचा आड पडताना न ठेवता उत्तरे दिली. त्यांच्या ईशान्य भारतातील नागालँड राज्यातील पहिल्या पोस्टिंगपासून कोल्हापुरातील पोस्टिंग पर्यंत विविध प्रशासकीय व वैयक्तिक अनुभवांची शिदोरी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर खुली केली. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ‘नेव्हर गिव्हअप’ चा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. मानसिक ताणतणाव हा कामाचा एक भाग आहे त्याचे व्यवस्थापन आपल्यालाच करावे लागते अशा प्रकारचे मत व्यक्त केले. स्वत:च्या विचाराने वावरताना इतरांच्या अनुभवाचाही आदर आपण केला पाहिजे असे प्रांजळ मत डॉ.बलकवडे यांनी व्यक्त केले.आपल्याला खरंच समाजासाठी, देशासाठी काही भरीव योगदान करायचे असेल व हे करताना पडद्यामागचे सूत्रधार म्हणून रहायचे असेल तरच विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यावे अशा प्रकारचा मौलिक सल्ला यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थी प्रतिनिधी सुजीत भोसले व बंदिनी पाटील यांनी मुलाखत घेतली. डॉ.मोहन वनरोट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. स्वरुपा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांची ओळख शुभम कुंभार यांनी करून दिली. वैष्णवी कांबळे यांनी प्रास्ताविक केेले. ओंकार बिराजदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन ‘लिड इंडियाचे’ समन्वयक प्रा.अमित वैद्य व प्रा.प्रियांका माने यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ.विलास कार्जिन्नी,रजिस्ट्रार डॉ.मनोज मुजुमदार उपस्थित होते.