गडहिंग्लजमधील आरटीई २५ टक्के प्रवेशातील अनियमिततेची चौकशी; त्रिसदस्यीय समिती नियुक्त
schedule23 Jul 26 person by visibility 62 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गडहिंग्लज तालुक्यातील आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित झाला होता. जवळपास एक महिना होत आल्यानंतर प्रशासानने समिती नेमली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या आदेशानुसार ही समिती नेमली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
जिल्हा परिषदेच्या २५ जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत 25 हून अधिक विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश झाले नाहीत. त्या शिक्षण संस्थांच्यावर काय कारवाई केली ? असा सवाल सभागृहात उपस्थित केला होता. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांनी, प्राथमिक शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर, अमरसिंह चव्हाण यांनी या विषयावरील चर्चेत सहभाग घेताना त्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी सूचना केली होती. मात्र त्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळाला नाही. गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभेतही हा विषय गाजला होता.
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकच्या सूचनेनुसार गडहिंग्लज पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याच्या व संबंधित कामकाजाशी निगडीत कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश काढल्याचे अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी म्हटले आहे. या चौकशी समितीमध्ये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी शशिकांत बडे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तर गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील (चंदगड) आणि प्रबुद्ध कांबळे (भुदरगड) यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल २९ जुलै २०२६ पर्यंत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करणार असून, चौकशीत कोणताही विलंब होऊ नये यासंबंधी दक्षता घ्यावी असे आदेशात म्हटले आहे.