बालिंगे हायस्कुल येथे गुणवंताचा गौरव
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी अपार कष्टाची तयारी ठेवा. सूक्ष्म नियोजन करुन अभ्यास केल्यास यशाला गवसणी घालणे सहज शक्य होते. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी केले.
करवीर तालुक्यातील बालिंगे येथील बालिंगे हायस्कुलमध्ये आयोजित गुणवंताच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव जांभळे होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे म्हणाले, आपण सगळे शेतकऱ्यांची मुले आहोत, काळ्या मातीतील कष्टाची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि रिल्सच्या जाळ्यात न आडकता संयम ठेवत कष्टाची तयारी ठेवली तर कोणत्याही परीक्षेत यश तुमचेच असते.
शिक्षण संस्थेचे सहसचिव मधूकर जांभळे म्हणाले, सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची मुले कष्टाच्या बळावर कशी झेप घेऊ शकतात हे सरदार नाळे व तुषार बुरुड यांनी दाखवून दिले आहे. आज विद्यार्थ्यांना अशा व्यक्तीमत्वाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम असून या शाळेचे विद्यार्थी आज उच्च पदस्थ असल्याचा अभिमान वाटत आहे. आगामी काळात शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांचे ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील.
मुख्याध्यापक एच. के. पटवेगार यांनी स्वागत केले. इयत्ता सहावी ते दहावीतील गुणवंतासह बी. पी. पाटील, राजू कोरे, शिवाजी यादव, निरंजन जांभळे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच सुधा वाडकर, माजी सरपंच मयूर जांभळे, शिक्षण संस्थेचे सदस्य एम. एस. भवड, खजानीस अशोक घोडके आदी उपस्थित होते. संस्थेचे सदस्य विशाल जांभळे यांनी आभार मानले.