पीएचडी विद्यार्थ्यांचे अर्धशतक ! डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडले पन्नास संशोधक !!
schedule22 Jul 26 person by visibility 33 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रा. डॉ. पी. एस. पाटील…जागतिक स्तराचे शास्त्रज्ञ. पदार्थ विज्ञान विषयातील जगभरातील नावाजलेले संशोधक. शिवाजी विद्यापीठातील फिजीक्स विभागाचे माजी विभागप्रमुख. विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू आणि सध्या डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५० विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. प्राचार्य पी. आर. पाटील हे पीएचडीचे पहिले विद्यार्थी. त्यांनी शैक्षणिक वर्ष २००० मध्ये पीएचडी प्राप्त केली. तर नुकतेच पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. श्वेता पवार या पन्नासाव्या विद्यार्थी ठरल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी संशोधक म्हणून विविध ठिकाणी कार्यरत आहेत. काही जण अमेरिका, जपान, दक्षिण कोरियात आहेत. तर काही जण प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक बनले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी प्राप्त, प्रा.डॉ. एन. एल. तरवाळ आणि प्रा. डॉ. एस. बी. सादळे हे सध्या शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पीएचडी विद्यार्थ्यांचे अर्धशतक झाले, हे निश्चितच मार्गदर्शकासाठी आनंददायी व अभिमानास्पद. यानिमित्त डॉ. पी. एस. पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते साऱ्यांनाच प्रेरणादायी आहे.
हा प्रवास शब्दबद्ध करताना डॉ. पी. एस. पाटील लिहितात, ‘ पस्तीस वर्षांपूर्वी, मी एका जवळपास रिकाम्या प्रयोगशाळेत उभा होतो—तेथे कोणतीही अत्याधुनिक उपकरणे नव्हती; होते ते फक्त एक स्वप्न, अफाट उत्साह आणि माझ्यासोबत तो प्रवास सुरू करण्यास इच्छुक असलेले दोन पीएचडी संशोधक विद्यार्थी. त्यानंतरची वर्षे अथक परिश्रम, धडा देणारे अपयश, आशा पल्लवित करणारे शोध आणि संशोधनाप्रती असलेल्या अतूट ओढीने भरलेली होती. टप्प्याटप्प्याने, त्या साध्या सुरुवातीचे रूपांतर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेत झाले; जिथे अनेक पिढ्यांमधील तरुण संशोधकांना स्वप्ने पाहण्याची, नवनवीन शोध लावण्याची आणि यशस्वी होण्याची संधी मिळाली.
आज, जेव्हा माझा ५० वा पीएच.डी. विद्यार्थी पदवी प्राप्त करत आहे, तेव्हा अनेक आठवणी माझ्या मनात दाटून येत आहेत. प्रत्येक यशामागे अनेक न दिसणारे संघर्ष, त्याग आणि चिकाटीचे क्षण दडलेले असतात. मागे वळून पाहताना मला जाणीव होते की, मला या प्रवासाचा प्रत्येक टप्पा आवडला—मग ती आव्हाने असोत किंवा यश. हा महत्त्वाचा टप्पा केवळ माझा नाही, तर प्रत्येक विद्यार्थी, सहकारी, सहयोगी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या कुटुंबाचाही आहे. जेव्हा मार्ग अनिश्चित वाटत होता, तेव्हा त्यांचे अतूट प्रेम, संयम, प्रोत्साहन आणि अनेक मूक त्यागांनी मला हे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ दिले. ५० व्या पीएच.डी. पर्यंतचा हा प्रवास अत्यंत समाधानकारक राहिला आहे. हा प्रवास इथेच थांबत नाही, तर तो मला पुढील काळातही शिकत राहण्याची, मार्गदर्शन करण्याची आणि अधिक योगदान देण्याची नवी प्रेरणा देतो.’