इंडिया आघाडीतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने, निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाचा नकार
schedule21 Jul 26 person by visibility 378 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : दिल्ली येथील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीतर्फे मंगळवारी दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान विद्यापीठ प्रशासनाने, " आंदोलनाचा विषय विद्यापीठाशी निगडित नाही त्यामुळे निवेदन स्वीकारण्यास व चर्चा करण्यास नकार दिला. आम्ही निवेदन स्वीकारणार नाही"असे कळविले असल्याचे सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी आंदोलनस्थळी सांगितले. निवेदन स्वीकारण्यास प्रशासनातील एकी अधिकारी न आल्यामुळे इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जाऊन त्या ठिकाणी निवेदन अर्पण केले
' प्रशासनाच्या या भूमिकेचा आंदोलनस्थळी धिक्कार करण्यात येत आहे. प्रशासनाने यापूर्वी विविध संघटनांचे निवेदन स्वीकारले आहेत मग हा विषय विद्यार्थ्यांचे निगडित असताना त्यांनी दुजाभाव का करावा ?असा सवाल मिठारी यांनी केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, विनायक फाळके, अमर समर्थ, सचिन शेंडे, दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, सुषमा जरग, धनश्री कोरवी, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, भारती पोवार, सिनेट सदस्य अभिषेक मिठारी, अमित जाधव, अजित जाधव , कॉम्रेड उदय नारकर, अतुल दिघे , संपतराव चव्हाण पाटील, दीपक थोरात, वेदवती मोहिते, श्रीधर पाटील, निलेश बनसोडे, संतोष जरग, सुनील जाधव , प्रशांत जरग, विनायक घोरपडे, प्रवीण पाटील, संजय पटकारे आदींचा सहभाग होता. तत्पूर्वी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इंडिया आघाडीचे कार्यकर्ते विद्यापीठ इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमले तेव्हा प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे निवेदन स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांना कळविण्यात आले यानंतर कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मारत जोरदार घोषणा दिल्या
"शिक्षण आमच्या हक्काचे नाही- कुणाच्या बापाचे, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, निवेदन न स्वीकारणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो , संविधान जिंदाबाद" अशा घोषणा देण्यात आल्या. सिनेट सदस्य श्वेता परुळेकर म्हणाल्या, " लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार करणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचे आंदोलन होते. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यासाठी आमची लढाई आहे. आमच्या भावना सरकारपर्यंत कळवाव्यात यासाठी आम्ही विद्यापीठात निवेदन द्यायला आलो होतो मात्र प्रशासनाने निवेदन स्वीकारले नाही. प्रशासनाची ही मनमानी योग्य नाही " असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर म्हणाले, ‘जंतरमंतर ते संसद मोर्चा दरम्यान शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावरील लाठीमाराचा निषेध व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपालांमार्फत राष्ट्रपतीपर्यत पोहोचवावे यासाठी आंदोलन आहे. शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी केंद्रीत असावी.’
चुकीच्या घोषणा नकोत, अतिउत्साही कार्यकर्त्यांना समज
आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांच्याकडून भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्याच वेळी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांच्या विरोधात ही अशोभनीय घोषणा देण्यास सुरुवात केली. अशा उत्साही कार्यकर्त्यांना सिनेट सदस्य अभिषेक मिठारे यांनी विद्यापीठासंदर्भात चुकीच्या पद्धतीने कोणीही घोषणा देऊ नयेत असे सांगितले.