ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांवर सरकारचे दुर्लक्ष, सर्वपक्षीय आमदार - खासदारांना भेटणार
schedule11 Mar 26 person by visibility 16 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. समाजातील अनेक घटकाकडे ना शेती, ना नोकरी अशी स्थिती बनली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजाची उन्नती साधणे आवश्यक असताना राज्यकर्ते मात्र गांभीर्याने या विषयाकडे पाहताना दिसत नाहीत. परशुराम आर्थिक विकास महामंडळ व अमृत प्रबोधिनीसाठी निधीची भरीव तरतूद करावी, समाजघटकाला लाभ मिळवून द्यावा यासाठी राज्यातील सर्वपक्षीय आमदार व खासदारांना भेटणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधून समाजातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडू. तरीही सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असे मकरंद कुलकर्णी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी, विधानसभेत परशुराम आर्थिक विकास महामंडळसंबंधी प्रश्न उपस्थित केला. समाजाच्या मागण्याकडे लक्ष वेधले. मात्र प्रशासन आणि राज्यकर्ते अनास्था दाखवित आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार हे ब्राह्मण समाजाच्या मागण्यासंबंधी आवाज का उठवित नाहीत ? असा प्रश्न पडत आहे. राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे समाजात नाराजी पसरत आहे. महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात परशुराम आर्थिक विकास महामंडळसाठी केवळ पाच कोटी रुपयांची तरतूद केली. मागील अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची घोषणा होती, परंतु प्रत्यक्षात त्या निधीचा समाजाला कोणताही ठोस लाभ झाला नाही. ब्राह्मण समाजाने महाराष्ट्राच्या शिक्षण, संस्कृती, प्रशासन आणि सामाजिक विकासात मोठे योगदान दिले आहे. तेव्हा सरकारने या समाजाच्या विविध विषयांकडे गांभीर्याने लक्ष देवून ठोस निर्णय घ्यावेत.असे कुलकर्णी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला धनंजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी, ईश्वर दिक्षीत, सूरज कुलकर्णी, प्रदीप अष्टेकर, राजेश आडके, कमलाकार देशपांडे आदी उपस्थित होते.