नेत्यांना हद्दवाढीविषयी देणेघेणे आहे की नाही ? पालकमंत्री, सहपालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : कृती समितीच्या बैठकीत तीव्र भावना
schedule16 May 26 person by visibility 73 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर वगळता एकही आमदार, खासदार व मंत्री हद्दवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. कोल्हापुरात राहायचे, सगळया सुविधा घ्यायच्या आणि शहराची हद्द ओलांडली की राजकीय स्वार्थासाठी हद्दवाढीच्या विरोधात भूमिका घ्यायची अशी प्रवृत्ती नेतेमंडळीची आहे. जिल्ह्यातील नेतेमंडळींना हद्दवाढीविषयी काही देणेघेणे आहे की नाही ? महापालिका निवडणुकीच्या अगोदर हद्दवाढ करू अशी ग्वाही साऱ्यांनीच दिली होती. मात्र याविषयावरुन शहरवासियांची दिशाभूल सुरू आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा…’अशा संतप्त भावना कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत उमटल्या.
कोल्हापूर प्राधिकरणला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दर्जा मिळाला. या पार्श्वभूमीवर हद्दवाढ कृती समितीची शनिवारी, १६ मे २०२६ रोजी कोलहापुरात बैठक झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष व माजी महापौर आर. के. पोवार यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. माजी नगरसेवक बाबा पार्टे, अशोक भंडारे, माणिक मंडलिक, अनिल कदम, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, सुनील देसाई, अनिल घाटगे, किशोर घाटगे, राजू जाधव, महादेव पाटील, गणेश जाधव आदींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.
बाबा इंदूलकर म्हणाले, ‘जनगणनेचे काम सुरू असल्यामुळे हद्दवाढ लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते. तेव्हा सरकारने हद्दवाढीची अधिसूचना आता काढावी आणि अंमलबजावणी एक एप्रिल २०२७ पासून करावी. जिल्ह्यातील आमदार, खासदार व मंत्र्यांनी शहरवासियांची दिशाभूल करू नये.’ प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी कोल्हापूरकरांची दिशाभूल सुरू आहे. प्रत्येकवेळी केवळ आश्वासने दिली जातात. पालकमंत्री आबिटकर व सहपालकमंत्री मिसाळ यांना कोल्हापूर शहराविषयी काही देणेघेणे आहे की नाही ? या दोघांनी पदाचा राजीनामा द्यावा.’ काँग्रेसचे संजय पोवार यांनी, ‘मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारकडून प्राधिकरणसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देऊ असे सांगितले होते मात्र निधी उपलब्ध झाला नाही.’असे सांगितले. शिवसेनेचे किशोर घाटगे यांनी, खासदार शाहू महाराज यांनी हद्दवाढीच्या विषयात लक्ष घालावे अशी मागणी केली. मनसेचे राजू जाधव यांनी, ‘हद्दवाढीसाठी आता आक्रमक आंदोलन करण्याची वेळ आली आहे.’असे नमूद केले. राष्ट्रवादीचे अनिल घाटगे यांनी, महाविकास आघाडीचे सरकार असो की महायुतीचे सरकार, कोल्हापूरची केवळ फसवणूक केली आहे.’असा आरोप केला. माजी नगरसेवक अशोक भंडारे, माजी नगरसेवक अनिल कदम यांनी नेतेमंडळींना कोल्हापूरच्या विकासासंबंधी आस्था आहे की नाही असा सवाल केला. हद्दवाढीची चळवळ व्यापक करु आणि लोकांना सामावून घेऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवू असे आवाहन यावेळी केले.
…………………..
महापौर, नगरसेवकांची बैठकीकडे पाठ
बाबा इंदूलकर म्हणाले, ‘महापौर रुपाराणी निकम, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास, भाजपचे स्वीकृत नगरसेवक व महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना ठाकरे पक्षाचे नगरसेवक सुनील मोदी यांना आजच्या बैठकीसाठी रितसर बोलाविले होते. पण यासाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली आहे. एकही जण आला नाही.’