महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, संघटना प्रतिनिधींनी व नागरिकांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत सोबत असल्याची ग्वाही दिली.दरम्यान शाहू महाराजांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुका दौऱ्यावर असलेले युवराज संभाजीराजे हे शनिवारी, नवीन राजवाडयावर परतले. त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन अभिनंदन केले. ‘अभिनंदन बाबा !’ म्हणत त्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. संभाजीराजे यांनी त्या पोस्टमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत ते पुढीलप्रमाणे...
‘अभिनंदन बाबा...
गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली.
हातातले काम... पुढे दिलेला शब्द.... आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्यांकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली.
महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे.’