महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊनच कर्जदार व बिगर कर्जदार सभासदांच्या हितासाठी अमृत संजीवनी योजना राबवली. सहकार विभागाचीही मान्यता घेतली. मात्र शिक्षक बँकेचा आर्थिक वर्षातील विक्रमी नफा आणि आर्थिक शिस्त यामुळे अनेक गोष्टींना चाप बसला. शिक्षक बँकेची घोडदौड सुरू आहे, यामुळे विरोधकांना पोटशूळ उठले आहे.‘असा आरोप बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील यांनी केला.
‘चालू आर्थिक वर्षात बँकेला तीन कोटी २२ लाख रुपयांचा नफा झाला आहे. भविष्यात पाच कोटी नफ्याचे उद्दिष्ट ठेवून संचालक मंडळ काम करत आहे. आम्हाला यापासून विचलित करण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी संचालक मंडळ, सुकाणू समिती व सभासदांच्या विश्वासाच्या बळावर हे उद्दिष्ट निश्चित पार करू.’असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
बँकेचे चेअरमन पाटील व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये शिक्षक बँकेत बुधवारी पत्रकार परिषद झाली. या सभेत चेअरमन पाटील म्हणाले, ‘पूर्वीच्या संचालकांनी चुकीच्या पद्धतीने नोकर भरती केली. त्यामुळे होणाऱ्या कारवाईपासून दुसरीकडे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक केविलवाणा प्रयत्न करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. पाटील म्हणाले, ‘बँकेत मार्चअखेर तेरावा पगार कर्मचाऱ्यांना दिला जात होता. या प्रकरणी आर्थिक घडामोडी व्हायच्या. बँकेत सत्ताबदल झाला आणि आम्ही या सगळया प्रकरणाला चाप लावला. यामुळे सभासदांच्या ३६ लाख रुपयांची बचत झाली असेही पाटील म्हणाले.
‘शिक्षक बँकेतर्फे सभासदांना ४१ लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. दुर्दैवाने सभासदाचा मृत्यू झाला तर अख्खं कुटुंब अडचणीत सापडते. त्या कुटुंबाची फरफट होऊ नये यासाठी ही योजना आहे. या योजनेत सर्व सभासदांनी सहभाग घेतला तर तीस कोटीचा निधी जमा होईल. त्यावर सरासरी सात टक्के व्याजातून दोन कोटी १० लाख रुपये इतके व्याच जमा होईल आणि त्या व्याजातून ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या योजनेविषयी सभासदांची दिशाभूल केली जात आहे. बँकेला बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. दरम्यान शिक्षक बँकेचे सभासद सूज्ञ आहेत. बँकेला झालेला विक्रमी नफा हेच विरोधकांच्या सर्व आरोपांना चोख उत्तर आहे’असेही चेअरमन पाटील यांनी सांगितले.
सध्या बॅँकेची घोडदौस राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीच्या सर्व नेते मंडळी व सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशी माहिती व्हाईस चेअरमन अमर वरुटे यांनी दिली. पत्रकार परिषदेला बँकेचे संचालक अर्जुन पाटील, सुनील एडके, एस. व्ही. पाटील, शिवाजी बोलके, बाळासाहेब निंबाळकर, शिवाजी रोडे पाटील, बाळकृष्ण हळदकर, बाबू परीट, नंदकुमार वाईंगडे, गजानन कांबळे, रामदास झेंडे, गौतम वर्धन, सुरेश कोळी, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, तज्ज्ञ संचालक तानाजी धरपणकर, सतीश तेली व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम आदी उपस्थित होते.