Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

प्रत्येक वेळेला विषयांतर कशासाठी? हिम्मत असेल तर स्पष्ट उत्तरं द्या ! शौमिका महाडिकांचे आव्हान

schedule14 May 22 person by visibility 1001 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
‘गोकुळ म्हणजेच जग समजून चार भिंतीच्या आत मनमानी कारभार करणारे हुकूमशहा अखेर आज जनतेसमोर आले. पण मी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत. म्हणूनच मी पुन्हा एकदा त्यांना जाहीर सवाल करते, माझे प्रामुख्याने 10 साधे प्रश्न आहेत. हिम्मत असेल तर त्या प्रश्नांची स्पष्ट उत्तर द्या. प्रत्येक वेळेस विषयांतर कशाला करता ?’असे खुले आव्हान विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी आघाडीला दिले.
महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांना दहा प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये ‘मंत्री सतेज सतेज पाटील हे २०१७ मध्ये सातत्याने विचारायचे की, ग्राहकांवर दरवाढ लादून खरेदी दर का वाढवले. मग आता तुम्ही काय जगावेगळं कर्तृत्व गाजवलं ? त्यातही विक्री दरात वाढ किती केली ? आणि मोबदला म्हणून शेतकऱ्यांना किती रुपये दिले ?
सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे महाडिक यांची २५ वर्षे सत्ता होती, पण त्यांनी स्वतःच्या हक्काच्या तालुक्यांमध्ये २५ वर्षात किती मतदान वाढवलं ? त्या तुलनेत आज एका वर्षात आपण किती नव्या डेअरीना मंजुरी दिली आहे ? त्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांची संख्या जास्त आहे ? आणि जर खरंच नवीन डेअरी होत आहेत तर त्या तुलनेत तालुक्यांमधून संकलन किती वाढलं ? आजपर्यंत शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिलेला दूध संघ पाच वर्षात घशात घालण्याचं नियोजन यामागे आहे का ? टँकरच्या वाहतुकीत पाच कोटींची बचत केली म्हणणाऱ्याना ती बचत शक्य झाली कारण जुने ठेकेदार कमी दरात वाहतूक करत होते. नवीन ठेका देण्याचा घाट घातल्यानंतर नवे दर काय दिले आहेत? त्यामध्ये कोणाच्या मालकीचे किती टँकर असणार आहेत? आणि ते जुन्या दराने वाहतूक करणार का? वासाचे दूध कमी झाले म्हणताय तर त्या वासाच्या दुधाची मागील तीन वर्षांची तुलनात्मक माहिती का जाहीर करत नाही ?
 …………………
तर महाडिक तुमचा जाहीर सत्कार करतील
विधानसभेच्या निवडणुकीत गोकुळचा विषय मी फार घेतला नाही. पण दक्षिणच्या वेळेस सतेज पाटील यांनी केलेली सर्व भाषण माझ्याकडे उपलब्ध आहेत. तेव्हा हाच सल्ला त्यांना द्यावा असं मंत्री मुश्रीफ यांना वाटलं नाही का ? बरं, मी तरी सन्मान ठेऊन बोलते, त्यांची भाषणं ऐकली तर स्वतःच्या गुरूला एकेरी बोलणाऱ्या या व्यक्तीबद्दल डोक्यात तिडीक जाते. त्यांना मुश्रीफ खरंच प्रामाणिकपणे काय सल्ला देतील ? मंत्री पाटील हे गेली दहा वर्षे पातळी सोडून गोकुळवर निरर्थक टीका करायचे तेव्हा ते संघाचा लौकिक वाढवायचं काम करत होते का ? वर्षभरात चांगला कारभार केला असता तर तुमचा जाहीर सत्कार आम्हीच केला असता आणि तेवढं मोठं मन महाडिकांकडे आहे, हे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा जाणतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सोंग करत बसण्यापेक्षा किमान इथून पुढेतरी स्वतःपेक्षा संघाच्या हिताला प्राधान्य द्यावं.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes