कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूर
schedule31 May 25 person by visibility 68 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही योजना कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवली जावी, यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला. लवकरच या निधीअंतर्गत प्रत्यक्ष विकास कामांना प्रारंभ होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
निधी मंजूर केल्याबद्दल खासदार महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले आहेत. राज्याच्या नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी या निधीचा विनियोग होणार आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींचे विज बिल थकीत आहे. पुरेसे उत्पन्न नसल्याने, अनेक ग्रामपंचायती विज बिल भरणा करू शकत नाहीत. त्याचा परिणाम जनजीवनावर आणि अनेक विकास योजनांवर होतो. अशा वेळी राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे अनेक ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे, वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र, प्रशिक्षण केंद्र अशा कामांसाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने भरघोस निधी दिला आहे. त्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २५१ गावांना फायदा होणार आहे.