महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गेले दोन, तीन दिवस उघडीप दिलेला पाऊस मंगळवारी रात्रीपासून पुन्हा एकदा धो धो कोसळत आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे धरणपरिसरात जोरदार पाऊस झाला. यापूर्वीच तुडंब भरलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. कोल्हापूरकरांसाठी धास्ती वाढविणारी बाब म्हणजे, राधानगरी धरणाच सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
बुधवारी पहाटे ४.३० ते ५.३० या वेळेत पाच दरवाजे उघडले. यापूर्वी दोन दरवाजे उघडे होते. राधानगरी धरणातून ११५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी दहा वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाणी पातळी ४३ फूट तीन इंच इतकी आहे. पंचगंगा नदी अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहे. पुन्हा धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने महापुराचा पुन्हा धोका संभवत आहे. जिल्ह्यातील ७१ बंधारे पाण्याखाली आहेत.
दरम्यान वारणा पाणलोट क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. यामुळे वारणा धरणातून बुधवारी, ३१ जुलै २०२४ रोजी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. सध्यस्थितीत सुरू असलेल्या ८०९२ क्युसेक्स विसर्गात वाढ करुन वक्र दरवाजाद्वारे १०११५ व विद्युत जनित्रमधून १४७० असे एकूण ११५८५ विसर्ग नदीपात्रात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन वारणा धरण व्यवस्थापनने केले आहे. तुळशी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे सध्या सुरू असलेल्या १५०० क्युसेक्स विसर्गात वाढ करुन २००० क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे. दूधगंगा धरणातूनही ९१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. दरम्यान बुधवारी सकाळी 11 वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान राधानगरी धरणाचा एक क्रमांकचा दरवाजा बंद झाला.