सभापतीपदी माझी निवड म्हणजे ४२ वर्षाच्या एकनिष्ठतेचे फळ ! ना नेता बदलला - ना गट !! सुर्यकांत पाटील
schedule08 Jul 25 person by visibility 101 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत मी १९८२ पासून राजकारणात काम करत आहे. या कालावधीत नेता बदलला नाही, कधी गट बदलला नाही. या एकनिष्ठतेचं फळ म्हणजे बाजार समितीच्या सभापतीपदी झालेली निवड होय. ’असे भावोत्कट उद्गार कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती सुर्यकांत पाटील यांनी काढले.
बाजार समितीच्या सभापतीपदी सुर्यकांत पाटील व उपसभापतीपदी राजाराम चव्हाण यांची निवड सोमवारी (७ जुलै २०२५) झाली. या निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना सभापती पाटील यांनी आपला जीवनपट उलगडला. ‘माझ्यासाठी आजचा दिवस वेगळा आहे. हा दिवस पाहण्यासाठी माझे आई-वडिल हवे होते. त्यांच्या आठवणी मनाला अस्वस्थ करतात. वडिलांना वाटायचं की, मुलाने राजकारणात मोठं व्हावं. माझ्या वाटचालीत ते कायम पाठीशी राहिले. गावात किंवा परिसरात सभाा असो की समारंभ, आम्ही व्यासपीठावर असताना ते सभेच्या बाहेर माझ्याकडे लक्ष ठेवत फिरत असायचे.’आठवणींचा हा पट उलगडताना पाटील यांना अश्रू अनावर झाले.
‘ग्रामपंचायत सदस्य, सरपंच म्हणून माझी कारकिर्द झाली. २०१२ ते २०१७ या कालावधीत बाचणीच्या सरपंचपदी काम केले. गावात अनेक सुधारणा केल्या. गावच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले. गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारला. मंत्री मुश्रीफ यांची मोठी साथ लाभली. छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणी आणि लोकार्पण सोहळा हा माझ्या जीवनातील मोठं काम होय.’ असे पाटील यांनी नमूद केले.
‘बाजार समितीत यापूर्वी प्रशासकीय मंडळात काम केले आहे. माजी आमदार के. पी. पाटील हे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष होते. मी त्या मंडळात सदस्य होतो. त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला. काम करण्याची मोकळीक दिली. त्यावेळीही बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी आम्ही प्रयत्न केले. आठवडी बाजारातील महसूल वीस लाखापर्यंत वाढविला.’ असे सांगत सभापती पाटील म्हणाले, आता बाजार समितीचे सभापती म्हणून नवनवीन संकल्पना राबवायच्या आहेत. बाजार समितीचे उत्पन्न २५ कोटीपर्यत वाढवून स्टार बाजार समिती बनवायची आहे. साऱ्या संचालकांना बरोबर घेऊन कामकाज करण्याच्या सूचना नेत्यांनी केल्या आहेत. मंत्री मुश्रीफ यांना मान खाली घालायला लागेल असे कोणतेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही.’
…………………
सभापती सुर्यकांत पाटील म्हणाले….
‘बाजार समितीच्या आवारातील रस्ते चांगले करणार. राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदिर सभागृह बीओटी तत्वावर विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बाजार समितीच्या आवारात कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारणी, चाळीस दुकानगाळे बांधून भाडेतत्वावर दिली जातील. शेतकरी,व्यापारी, तोलाईदार, हमाल या साऱ्या घटकांना सोबत घेऊन बाजार समितीचा नावलौकिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील.’