सीआयआयच्या अध्यक्षपदी सारंग जाधव, उपाध्यक्षपदी वीरेंद्र पाटील
schedule05 Mar 25 person by visibility 268 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजच्या [ सीआयआय ] २०२५ ची दक्षिण महाराष्ट्र विभागाची वार्षिक सभा रेसिडेन्सी क्लबमध्ये झाली. सीआयआय चे मावळते अध्यक्ष अजय सप्रे अध्यक्षस्थानी होते.यामध्ये २०२५-२६ साठी नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. 'सीआयआय' दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या नूतन अध्यक्षपदी सारंग जाधव व उपाध्यक्षपदी वीरेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.
सारंग जाधव यांचे नाव अजय सप्रे यांनी सुचवले, तर वीरेंद्र पाटील यांचे नाव सारंग जाधव यांनी सुचवले. यावेळी आगामी २०२५-२६ या वर्षासाठीच्या कार्य योजनांची माहिती नूतन अध्यक्ष सारंग जाधव यांनी दिली. ते म्हणाले आगामी वर्षात विविध सेमिनार्स, खरेदीदार विक्रेता मेळावा [बायर सेलर्स मिट] चे आयोजन केले जाईल, स्थानिक औद्योगिक संघटनांबरोबर समन्वय केला जाईल. या साठी त्यांनी सदस्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. नूतन उपाध्यक्ष पाटील यांनी सदस्य वाढीसाठी प्रयत्न केले जातील, यासाठी कोल्हापूर तसेच आसपासच्या जिल्ह्यांमधून नवीन सदस्य केले जातील असे सांगितले.
दरम्यान यंदाच्या वार्षिक सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून निर्लेप कुकवेअर आणि छत्रपती संभाजी नगर मधील एआयटीजी चे अध्यक्ष राम भोगले व गॅलिडिअन्स चे व्यवस्थापकीय संचालक व्ही. जी. अणदूरकर उपस्थित होते. अजय सप्रे यांनी प्रास्ताविक केले. माजी अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी सीआयआय महाराष्ट्र स्टेट कौन्सिल कडून कोल्हापूर मध्ये कार्यालय सुरू करण्याची तसेच सीआयआय च्या बारा केंद्राच्या माध्यमातून सीआयआय दक्षिण विभागाला मार्गदर्शन करण्याची मागणी केली. सीआयआय चे महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष विशाल कामत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या द्वारे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सीआयआयचे संचालक रोशन कुमार, स्मॅकचे चेअरमन राजू पाटील, व्हाईस चेअरमन भरत जाधव, मॅक चे अध्यक्ष मोहन कुशीरे, उपाध्यक्ष विठल पाटील, आयआयएफ चे चेअरमन विनय खोबरे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे, उद्योजक सचिन शिरगावकर, मोहन घाटगे, गिरीश चितळे, मंगेश पाटील, प्रताप पुराणिक, सचिन मेनन, आनंद देशपांडे, सुरेन्द्र जैन, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अमित कुमार गुप्ता, महेश दाते, संजय भगत, कुशल सामाणी आदी उपस्थित होते.मल्हार भांदुरकर यांनी सूत्रसंचालन केले.