हद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक
schedule19 May 26 person by visibility 11 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याऐवजी प्राधिकरणला विशेष दर्जा देत सरकारने कोल्हापूरकरांची फसवणूक केली आहे असा आरोप करत काँग्रसने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थगन प्रस्ताव मांडला. तसेच दिवसभरासाठी सभा तहकूब करण्याची मागणी केली. दरम्यान ‘हद्दवाढ व्हावी ही सभागृहाची व सगळया पक्षाच्या नगरसेवकांची भूमिका आहे. हद्दवाढीसाठी सामूहिकपणे प्रयत्न चालू ठेवू या. सभा दिवसभरासाठी तहकूब न करता पाच मिनिटासाठी सभा तहकूब करू”असे महापौर रुपाराणी निकम यांनी स्पष्ट केले. त्यानुसार पाच मिनिटानंतर पुन्हा सभा सुरू झाली. या सभेत नगरसेवकांनी, गांधीनगर येथील महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यावरुन आक्रमक झाले. आयुक्त राजेंद्र भारुड यांनी, कोर्टाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरूआहे. २६ मेपासून सुनावणी होत असल्याचे सभागृहाला सांगितले.
हद्दवाढप्रश्नी काँग्रेस आक्रमक होती. सभेला प्रारंभ होण्यापूर्वीच काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका चौकात निदर्शने केली. महायुती सरकारचा निषेध असो, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. सभेला प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. लाटकर यांनी, ‘सरकारकडून कोल्हापूरकरांची फसवणूक होत आहे. महापालिकेत सत्ता द्या, पंधरा मिनिटात हद्दवाढीचा प्रश्न सोडवितो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंधरा दिवस नव्हे चार महिने उलटले मात्र हद्दवाढीचा निर्णय काही घेतला नाही.उलट प्राधिकरणला विशेष दर्जा दिला. सरकारच्या या भूमिकेचा धिक्कार करत आहे.’असे सांगितले.
लाटकर यांच्या भाषणानंतर सत्ताधारी आघाडीतर्फे भूमिका मांडताना नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी,‘काँग्रेसने मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला काही अंशी विरोध व काही अंशी पाठिंबा आहे. स्थगन प्रस्तावातील काही शब्द वगळले तरच ठरावाला पाठिंबा देऊ. महापालिकेत यापूर्वी अनेकांची सत्ता होती. राज्यातही तेच सत्तेत होते. हाती सत्ता असताना हद्दवाढीकडे दुर्लक्ष करायचे आणि विरोधी बाकावर बसले की हद्दवाढीच्या प्रश्नावरुन उचल खायची, असे राजकारण कोणी केले, हद्दवाढीवरुन शहरवासियांची फसवणूक कोणी, कोणी केली याची कुंडली मांडावी लागेल. दरम्यान प्राधिकरणला विशेष दर्जा मिळाले म्हणून हद्दवाढ रखडली असे नव्हे. हद्दवाढीसाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सारे प्रयत्न करू या.’अशी भूमिका मांडली.
उचगाव ग्रामपंचायतीकडूनही कराचे कोट्यवधी रुपये वसूल क रा
प्रा. जयंत पाटील, राजेश लाटकर, सुनील मोदी यांनी तावडे हॉटेल परिसरातील अनाधिकृत बांधकामावरुन हल्लाबोल केला. ‘तावडे हॉटेल व गांधीनगर परिसरात महापालिकेच्या मालकीची १५८ एकर जागा आहे. सुप्रीम कोर्टाने ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचा आदेश दिल्यामुळे अखेर सत्याचा विजय झाला. मात्र महापालिकेच्या जागेत चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.पैशाच्या जोरावर महापालिकेला त्रास देण्याचा प्रयत्न झाला आहे. उचगाव ग्रामपंचायतीने तब्बल चार लाख चौरस फूट बांधकामाला परवानगी दिल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.मात्र ही जागा महापालिकेची आहे. कोर्टात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी सिनीअर वकील नेमा. ज्यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत ती हटविली पाहिजेत. बदमाशगिरी करणाऱ्यांना चाप बसला पाहिजे.’
………….
अनाधिकृत कॅफे, मसाज सेंटरवर कारवाई
शहरातील अनधिकृत कॅफे, मसाज सेंटरवर कारवाई झाली पाहिजे अशा सूचना नगरसेवकांनी केल्या. या सभेत अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याचा ठरावाला मान्यता देण्यात आली. अन्य विभागातही कायम नसलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी संबंधित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांनी प्रस्ताव का सादर केले नाहीत यावरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गटनेते शारंगधर देशमुख, इंद्रजीत बोंद्रे, आदिल फरास, सभागृह नेते मुरलीधर जाधव, सत्यजीत जाधव, वैभव माने, स्वरुप कदम, अमर समर्थ, विजय खाडे, विजय देसाई यांनी प्रश्नांचा भडिमार केला. अनधिकृत यात्रीनिवासवरुन नगरसेविका दीपा ठाणेकर, मंगल साळोखे यांनी प्रश्न उपस्थित केले.