फुटले पेव, जिल्ह्यात १११ खासगी अॅकेडमी ! शिक्षण विभागाकडून ना तपासणी-ना नियंत्रण !!
schedule11 Jun 25 person by visibility 400 category
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : विविध प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षेत यशाचा भुलभुलैया निर्माण करत खासगी कोचिंग अॅकेडमी जिल्ह्यात फोफावल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रवेश सरकारी- अनुदानित शाळेत आणि दिवसभर हजेरी मात्र कोचिंग अॅकेडमीत असा प्रकार सुरू आहे. शहर आणि जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था आणि कोचिंग अॅकेडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या देवाण-घेवाणीचा अर्थपूर्ण व्यवहार हा चर्चेचा ठरला आहे. अनुदानित शाळा या कोचिंग अॅकेडमीशी सामील झाल्यामुळे शाळा-कॉलेजचे कॅम्पस रिकामे असे चित्र निर्माण झाले आहे. अनुदान सरकारचे घ्यायचे आणि विद्यार्थ्यांचा पुरवठा अॅकेडमीला प्रकार जोरात आहे. माध्यमिक शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. शाळा-कॉलेजला अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांचा पट तपासल्याचे एकही उदाहरण माध्यमिक शिक्षण विभाग व शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नाही.
खासगी अॅकेडमीच्या विरोधात तक्रारी झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने माहिती संकलित केली आहे. यामध्ये जिल्हयातील उपब्लध अॅकेडमींची आकडेवारी संकलित झाली. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १११ अॅकेडमी आहेत. यामध्ये पन्हाळा तालुक्यात बारा , हातकणंगलेत आठ, करवीर पाच, शिरोळ सात, भुदरगड अकरा, राधानगरी २६, कोल्हापूर शहर १९, कागल तालुक्यात बारा, गडहिंग्लजमध्ये चार, चंदगडमध्ये एक, शाहूवाडी तीन अॅकेडमी असल्याची शिक्षण विभागाची माहिती आहे. वास्तविक शिक्षण विभागाच्या आकडेवारीपेक्षा जादा अॅकेडमी शहर व जिल्ह्यात आहेत. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने जिल्ह्यात किती खासगी अॅकेडमी सुरू आहेत ? अशीं विचारणा माध्यमिक शिक्षण विभागाकडे केली होती. तसेच प्रवेश शाळेत आणि उपस्थिती अॅकेडमीत असा प्रकार सुरू असणाऱ्या संस्थेवर कारवाईची मागणी केली होती.
सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पगारावर पैसा खर्च करत असताना अनुदानित शाळेतील रिकामे वर्ग हे चिंताजनक आहे. खासगी अॅकेडमीकडून आठवीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू आहे. आठवी, ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यावर लक्ष ठेवून अॅकेडमीत दाखल केले जाते. एकेकाळी शहरातील विविध शाळा-कॉलेजमधील कँम्पस हा विद्यार्थ्यांनी गजबजलेला असे. दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग तर तुडूंब भरलेले असे. शाळा-कॉलेजिअसतर्फे स्कॉलर बॅच निवडले जात. मात्र गेल्या काही वर्षात हे सारे चित्र बदलले.
विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा भुलभुलैय्या निर्माण करुन खासगी कोचिंग अॅकेडमीने दुकानदारी थाटली आहे. बोर्डाच्या परीक्षेवेळी कोणतीही अडचणी उदभवू नये म्हणून एखादा शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश करायचा आणि वर्षभर विद्यार्थी अॅकेडमीत शिक्षण. या प्रकाराविरोधात शिक्षण विभागाकडून तक्रारी झाल्या. मात्र शिक्षण विभागाने अॅकेडमींवर कारवाईचे अधिकार नाहीत असे सांगून हात वर केले. वास्तविक माध्यमिक शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालक कार्यालयाला शाळा व ज्युनिअर कॉलेज तपासणीचे अधिकार आहेत. मात्र त्यांच्याकडून वस्तुनिष्ठ अशी विद्यार्थी पट पडताळणी होत नाही.
……………………………………
‘‘ जिऱ्ह्यात खासगी अॅकेडमीं भरमसाठ वाढल्या आहेत. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. अनेक शाळा, संस्था सरकारी अनुदान घेतात आणि त्या संस्थेचे विद्यार्थी शालेय वेळेत अॅकेडमीत असतात. शिक्षण विभागाने विशेष परवानगी घेऊन अशा संस्था व अॅकेडमीवर कारवाई करावी.’
- रुपेश पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड