बाबा देसाईंच्या स्नेहधाग्यांनी सर्वपक्षीय एकवटले, शोकसभेत आठवणींनी गहिवरले
schedule26 Apr 25 person by visibility 128 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विजय उर्फ बाबा देसाई यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते एकवटले. राजकीय मतभेद आणि विचारसरणी बाजूला ठेवत पदाधिकाऱ्यांनी, बाबा देसाई यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. फेरीवाले, हॉस्पिटलमधील कामगार, कष्टकरी, वंचित अशा विविध घटकांसाठी त्यांनी केलेले काम हे अविस्मरणीय आहे असे नमूद केले. कामगार ते कामगार नेता आणि कार्यकर्ता ते नेता हा त्यांचा राजकीय प्रवास उलगडताना अनेकांना गहिवरुन आले.
‘आयुष्यभर पक्ष आणि विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या बाबा देसाईंचे कार्य हे प्रेरणादायी आहे. ते अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. त्यांनी, अनेकांना पक्षात आणले पण स्वत : कधी पक्ष बदलला नाही. यावरुन त्यांची पक्ष व विचारावरील निष्ठा स्पष्ट होते. विविध घटकांना पक्षात सामावून घेत त्यांनी भाजपला सर्वस्पर्शी बनवले.’ असे उद्गगार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. नागाळा पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शनिवारी (२६ एप्रिल २०२५) सायंकाळी शोकसभा आयोजित केली.
प्रारंभी, बाबा देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवाद केले. याप्रसंगी बोलताना मंत्री पाटील यांनी भाजपचे दिवंगत नेते सुभाष वोरा, बाबा देसाई यांच्या पक्षकार्याचे महत्व अधोरेखित केले. त्यांच्या कार्याचे सतत स्मरण राहावे यासाठी विविध उपक्रम राबवू. शिवाय नागाळा पार्क येथील भाजपा कार्यालयातील ग्रंथालयाला ‘स्वर्गीय बाबा देसाई ग्रंथालय’ व बिंदू चौक परिसरातील भाजप कार्यालयात ‘स्वर्गीय सुभाष वोरा एमपीएससी-यूपीएससी अभ्यासिका’ असे नाव देण्यात येत असल्याचे सांगितले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘बाबांनी शोषित, कष्टकऱ्यांसाठी काम केले. कोल्हापूरच्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सहभाग असायचा. संघटनात्मक कामावर त्यांचा भर होता. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. आज भाजपाचा जे यश, विस्तार नजरेस पडतो त्यासाठी अनेकांनी त्याग, बलिदान दिले. यामध्ये बाबा देसाईंचा समावेश होता.’ आमदार चंद्रदीप नरके यांनी ग्रामीण भागांशी नाळ जुळलेला नेता म्हणजे बाबा देसाई होय’असे नमूद केले. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी भाजपच्या वाटचालीतील देसाईंचे योगदान अधोरेखित केले. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी बाबा देसाई यांचा मृत्यू हा सर्वांच्या मनाला चटका लावणारा ठरला अशी भावना व्यक्त केली. पक्षाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारे व्यक्तिमत्व होते असे त्यांनी नमूद केले. कार्यकर्ता समीर नदाफ यांनी दिवंगत नेते सुभाष वोरा, बाबा देसाई यांच्या कामाची पद्धत, माणसे जोडणे, टिकवून ठेवण्याची हातोटी सांगितले.
यावेळी भाजपाचे मकरंद देशमुख, माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, सुनील मोदी, बाबा इंदूलकर, किशोर घाटगे यांनी श्रद्धाजंली वाहिली. शोकसभेला आमदार राहुल आवाडे, काम्रेड दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, भाजपाचे महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, महिला आघाडीच्या रुपाराणी निकम आदी उपस्थित होत्या.