महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचे राजेश क्षीरसागर हेच सूत्रधार – राजेश लाटकरांचा हल्लाबोल
schedule03 Dec 25 person by visibility 21 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचे आमदार राजेश क्षीरसागर हेच सूत्रधार आहेत. सत्ता महायुतीची, ते स्वत : शहराचे आमदार असताना त्यांनी कोल्हापूर शहरासाठी कोणत्या मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या ते सांगावे. अधिकाऱ्यांच्या नेमणुका यांच्या मर्जीने, विकासकामांचा ठेकाही मर्जीतील कंत्राटदारांना पुन्हा हेच प्रशासनाला व कंत्राटदारांना दोष देणार ? कंत्राटदारांना उद्देशून किती खाणार, खाऊन खाऊन पोट फुटेल असे म्हणाऱ्या आमदार क्षीरसागर यांनी एकदा आरशात पाहावे, विकासकामातील निधीची टक्केवारी खाऊन कंत्राटदारांचे पोट फुगलेय की त्यांच्या पोटाचा घेर वाढलाय ?’ असा हल्लाबोल स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांनी केला.
विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला. वर्षपूर्ती साजरी करणाऱ्या महायुतीच्या आमदारांनी कोल्हापूरसाठी काय केले असा सवालही लाटकर यांनी केला. काँग्रेस कमिटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, रखडलेली विकासकामे, निधीच्याआकडेवारीचा फुगवटा यावरुन महायुती सरकार व आमदार क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडले. महायुतीकडून ‘दहा विरुद्ध् शून्य’अशा बाता मारल्या जातात. मंत्री, पालकमंत्री हे महायुतीचे, शहराचे आमदार ही तुम्ही पुन्हा विकासकामांवरुन दोष दुसऱ्यावर कशाला ढकलताय. सध्या सत्ताधाऱ्यांचा ‘तो मी नव्हेच…’ हा नाट्यप्रयोग सुरू आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून जनतेसमोर आपण किती काम करतोय हे दाखविण्याचा खटाटोप आमदारांच्याकडून सुरू आहे.’
लाटकर म्हणाले, ‘ शहरातील कोणताही रस्ता सुस्थितीमध्ये नाही. दोषदायित्व कालावधीतील रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असते. मात्र दोषदायित्व कालावधीतील रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी विभागीय कार्यालयनिहाय प्रत्येकी पन्नास लाख रुपये या कामासाठी दिले. जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. महापालिका प्रशासकांनी या साऱ्या बाबी गांभीर्याने घ्याव्या. कंत्राटदार, अधिकारी जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टातही जाणार आहोत. कंत्राटदार खाडे, पोवार, निर्माण कन्सट्रंक्शन यांना ठेका कुणामुळे मिळाला हे सर्वश्रृत आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि शंभर कोटींच्या निधीतील कामााी त्रयस्थ संस्थेमार्फत लेख लेखापरीक्षण झाले पाहिजे. आणि लेखा परीक्षणाचा अहवाल पंधरा दिवसात जनतेसमोर मांडला पाहिजे. रस्ते कामातील भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही गोळा केले आहेत ते जाहीर करू. कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई झाली पाहिजे.’ पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेविका भारती पोवार, माजी नगरसेवक धनंजय सावंत, कैलास गौडदाब, प्रा. सुरेश ढोणुक्षे, महेश जाधव, विनायक फाळके, तौफिक मुल्लाणी, दुर्वास कदम, राजू साबळे, रियाज सुभेदार, अमर समर्थ, सागर यवलुजे, संजय पटकारे आदी उपस्थित होते.