मुकुंदराव पाटील पत्रकारिता -साहित्य पुरस्कर जाहीर ! विश्वास पाटील, रवींद्र गुरव, धनाजी घोरपडे, सचिन पाटलांचा समावेश ! !
schedule03 Dec 25 person by visibility 35 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्यावतीने देण्यात येणारे २०२५ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारीता व साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष कॉ.बाबा आरगडे व सचिव उत्तमराव पाटील यांनी दिली. रोख रक्कम,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती तरवडी यांच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदा, दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार-२०२५ हा कोल्हापुरातील लोकमतचे उपवृत्त संपादक विश्वास शामराव पाटील यांना जाहीर झाला आहे. पाटील हे तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत आहे. विविध दैनिकात त्यांनी काम केले आहे. शोधपत्रकारिता, सडेतोड लेखन व वस्तुनिष्ठ मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये आहत.
साहित्य पुरस्कार-२०२५ मध्ये इचलकरंजी येथील रवींद्र रेखा गुरव (कादंबरी-बे दुणे शून्य), माधव जाधव नांदेड ( कथा-आमचं मत आम्हालाच), सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहाद्दूरवाडी येथील धनाजी धोंडीराम घोरपडे (कविता-जामिनावर सुटलेला काळा घोडा),अमरावती येथील गजानन इंदुशंकर देशमुख अमरावती (चरित्र-सबकु सलाम बोलो), अहिल्यानगर येथील संजय बोरुडे र(ललित गद्य-लोकधन), प्रभाकर गायकवाड,परभणी (वैचारिक-मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण), राजेंद्र सलालकर,अहिल्यानगर(समीक्षा-तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण) यांना जाहीर झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कर्नाळा येथील सचिन वसंत पाटील (मायबोली रंग कथांचे) यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. वरील ग्रंथनिवड प्रा.डॉ.सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, डॉ. महेबूब सय्यद या निवड समितीने केली आहे.
सहायक शिक्षक रवींद्र रेखा गुरव हे इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत आहेत. लेखक, व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे. सावट हा कथासंग्रह, बे दुणे शून्य ही कादंबरी प्रकाशित आहे. बहादुरवाडी येथील कवी व समीक्षक धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या 'जामिनावर सुटलेला काळा घोडा' या कवितासंग्रहास राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचा हा दुसरा कवितासंग्रह आहे. सचिन पाटील यांचा, ‘ अवकाळी विळखा’हा कथासंग्रह, येरे येरे पैसा हा लेखसंग्रह, पाय आणि वाटा हा ललित गद्य प्रकाशित आहेत.