किकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकर
schedule24 Aug 26 person by visibility 24 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळने किकवी येथे केलेल्या प्लांट खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे आणि सखोल चौकशी एसआयटी किंवा ईडी मार्फत करावी', अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी यासंबंधीचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संस्थेच्या हिताचा विचार करून आणि सभासदांमध्ये संभ्रम राहू नये या भावनेतून खरेदी व्यवहाराची माहिती जनतेसमोर आली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. कारण युती म्हणून आमच्या मित्रपक्षावर आरोप होत असताना पाहणं आमच्यासाठी वेदनादायक आहे. त्यामुळे आमच्या मित्रपक्षांच्या म्हणण्याप्रमाणे 'जर खरोखरच व्यवहार चोख असेल, तर चौकशी ही धोका नसून त्यांच्या प्रामाणिकतेची पावती ठरेल' अशी मैत्रीपूर्ण भावना आमची आहे. त्याचबरोबर आमच्या मित्रपक्षाने कारण नसताना इतर लोकांवर जे आरोप केले आहेत. त्या आरोपात कितपत तथ्य आहे ? नेमका खर्च किती ? बचत किती ? कोणाकोणाला कधी, किती रुपये अदा केले गेले ? कोणकोणत्या व्यवहारासाठी केले गेले ? इत्यादी गोष्टींची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. याशिवाय गायत्री कोल्ड स्टोरेजचे विजय ढेरे यांना यापूर्वी अधिकचे पैसे दिले गेले असे आमच्या मित्रपक्षाचे म्हणणे आहे, असे वाचण्यात आले. ढेरे हे आमच्या त्याच मित्रपक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आहेत. या पक्षाचे दोन वेळा अधिकृत उमेदवार राहिलेले आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय प्रकाशराव ढेरे हे मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजकीय जन्म होण्यापूर्वी आणि माजी चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या जन्माच्या पण पूर्वी शरद पवार यांच्यासोबत मंत्री होते. त्यामुळे त्यांच्याच पक्षाचे विजय ढेरे चुकीचे आहेत की नाही ? याचा खुलासा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी करावा, यासाठी लवकरच आम्ही त्यांचीही बारामतीमध्ये जाऊन भेट घेणार आहोत.