ना मुहूर्त पाहतो, ना स्वत: श्रीफळ वाढवितो…अमावस्येला कामाला प्रारंभ, कर्मावर विश्वास ! संजय घोडावतांचा अनोखा बिझनेस फंडा !!
schedule28 Jun 26 person by visibility 120 categoryउद्योग
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : ‘क्षेत्र व्यापार- व्यावसायिकतेचे असो की अन्य क्षेत्रातील करिअरचे. आयुष्यात मोठी स्वप्नं पाहा. उच्च ध्येय हवे. आणि ते साध्य करण्यासाठी अथक परिश्रमाची जोड हवी. वयाच्या सहाव्या वर्षी मी, हेलिकॉप्टर उडवायची स्वप्नं पाहत होतो. वयाच्या चाळीसाव्या वर्षी ही स्वतचे हेलिकॉप्टर घेतले. ५३ व्या वर्षी पायलट बनलो. ५५ व्या वर्षी विमान खरेदी केली. पुढे प्रवाशी विमान सेवा सुरू केली. आज विविध उद्योग क्षेत्रात घोडावत उद्योग समूह हा एक ब्रँड बनला आहे…यशस्वी व्हायचं असेल तर कठोर मेहनत करा, स्मार्ट वर्क करा आणि स्वत:च ब्रँड बना. अपयशाने खचायचं नाही. संयम आणि सातत्य हे यशस्वी उद्योजकतेचे दोन मूलभूत स्तंभ आहेत. मला सांगायला विशेष आनंद होतो, मी मीठापासून विमान प्रवासापर्यंत सेवा देणारी टाटा समूहानंतर घोडावत उद्योग समूह आहे…’हे स्वानुभवाचे बोल आहेत, उद्योगपती संजय घोडावत यांचे.
निमित्त होतं, बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनलतर्फे आयोजित ‘इंडस्ट्रीयल मिन्क्सर ३.०’चे. बीएनआयतर्फे २७ जून २०२६ रोजी कोल्हापुरात ’राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग् मेळावा’ आयोजित केला होता. हॉटेल सयाजी येथे आयोजित या मेळाव्यात घोडावत यांच्या प्रेरणादायी भाषणाने विविध भागातील कारखानदार, उद्योजक, व्यावसायिक प्रभावीत झाली. चाळीस मिनिटाच्या भाषणात घोडावत यांनी, ‘उद्योग विस्ताराच्या प्रक्रियेत उद्योजकांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुका, त्यातून घेतलेले धडे, प्रभावी व्यवस्थापन, नेतृत्व आणि शाश्वत वाढीसाठी आवश्यक धोरणे.’याविषयी ऊहापोह केला.
अॅलन मस्क, अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर यांच्यासह देश आणि जगभरातील यशस्वितांचे दाखले देत घोडावत यांनी भाषण रंगविले. कधी व्यापार-व्यवसायातील अडचणी मांडत, कधी यशाचे किस्से सांगत त्यांनी अतिशय खुमासदारपणे व्यापार, व्यवसायातील यशस्वी होण्याची सूत्रे उलगडली. हिंदी सिनेमातील गाणी, शेरोशायरी ऐकवित उपस्थितांना व्यक्तिमत्व हे दिलखुलास असावे याची प्रचिती घडविली. ‘आयुष्यात कुणाविषयी वाईट चिंतू नको. एखाद्याचे चांगले करता आले नाही तर गैरकृत्येही करू नका. आयुष्यात पैसा महत्वाचा आहे, त्यासोबतच जीवनात सुख आणि शांती आवश्यक आहे. त्यासाठी सतकर्मे करायला हवीत. जीवनात स्वप्नं मोठी बाळगा, अंगी निर्णय क्षमता बाळगा. योग्य वेळी योग्य कामे झाली पाहिजेत. त्यासाठी कर्मावर विश्वास ठेवा. मी कधीही मुहूर्त पाहत नाही, स्वत श्रीफळ वाढवित नाही. मॅनेजर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते माझ्या प्रकल्पाचे उद्घाटन करतो. अमावस्येला कामे सुरू करतो. स्वत:चे आरोग्य सांभाळा. त्यासाठी फिटनेस गरजेचा. मी, रोज दोन तास वर्कआऊट करतो. अर्धा तास योगासने करतो. आज माझे वय ६२ वर्षे आहे. पण व्यायाम कधी चुकत नाही. मी आजपर्यंत ८७ वेळा रक्तदान केले आहे. ”असे घोडावत यांनी सांगितले.
‘मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो. लहानपणी मी अतिशय खोडकर होतो. जितक हुशार तितका हट्टी. बॅक बेंचर होतो. शालेय जीवनातच मी, हेलिकॉप्टर चालवायची स्वप्नं पाहत होतो. मी जी स्वप्नं पाहत होतो, त्याची खेळणी सुद्ध आपल्या येथे मिळत नव्हती. पुढे मेकॅनिकल इंजिनीअर झालो. आमचे कुटुंब हे बिझनेसही निगडीत. मी मात्र मेकॅनिकल इंजिनीअर. वडील म्हणायचे, व्यापार व्यवसाय करा. मला काही तरी वेगळं करायचं होते. वडिलांनी व्यवसायासाठी बारा लाख रुपये दिले.१९८६ मध्ये, माझा व्यवसाय सुरू केला. अॅल्युमिनियमची फॅक्टरी काढली. पण पहिल्याच वर्षी दहा लाख रुपयांचा तोटा झाला. मग पुढे कंझ्युमर प्रॉडक्ट बनवू लागलो. टेंपो होता. विविध ठिकाणी जाऊन वस्तू विक्री करायचो. जवळपास तीन लाख किलो मीटर टेंम्पो चालविला. लोकांचा विश्वास बसला. हा लंबी रेस का घोडा आहे असे व्यापारी, व्यावसायिक म्हणू लागलो. काहींनी मला व्यवसायासाठी अर्थसहाय केले. घोडावत उद्योग समूहाचा विस्तार वाढला. आटा, तांदूळ, तेल अशी विविध उत्पादने तयार करू लागलो. हवाई क्षेत्रातही भरारी घेतली. देशभरातील सगळया शहरांशी कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी हवी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मी आज अभिमानाने सांगतो, मीठाच्या उत्पादनापासून विमान प्रवासापर्यंत सेवा देणारी टाटा समूहनंतर घोडावत उद्योग समूह हा दुसरा उद्योग समूह आहे. सगळयांची मने जिंका, हृदयात राहा. आयुष्यात दुसऱ्याविषयी तक्रारी करु नका. ’असे घोडावत यांनी सांगितले.