मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार
schedule13 May 26 person by visibility 21 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: जत तालुक्यातील मोटेवाडी दुर्घटनेतील जखमी रूग्णांपैकी 4 रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे उपचारासाठी दाखल असून, या रूग्णांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली. तसेच सरकार त्यांच्या पाठीशी आहे, अशा शब्दात त्यांना धीर दिला. महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या मृतांच्या वारसांना सरकारकडून प्रत्येकी चार लाख रूपये मदत देण्यासाठी पाठपुरावा करू व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाईल, असा दिलासा पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिला.
मोटेवाडी येथे बारा मे २०२६ रोजी अवकाळी पावसामुळे मंदिराशेजारील पत्र्याचा शेड उडून भिंतीवर धडकल्याने भिंत कोसळून मरगुबाई यात्रेनिमित्त आलेल्या सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर तेरा जण जखमी झाले. पालकमंत्री पाटील यांनी या दुर्घटनेबाबत खंत व्यक्त करत तातडीने घटनेची माहिती घेऊन जखमींना धीर दिला. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथील भेटप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते. मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केला आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, हा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मांडू. मदत व पुनर्वसन मंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर मृतांच्या वारसांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करू. जखमींच्या उपचारांचाही सर्व खर्च शासनामार्फत केला जाईल. यासंदर्भात आवश्यक ती सर्व मदत देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या. दरम्यान दुर्घटनेतील जखमींवर मिरज मेडिकल कॉलेज, सांगली, सिनर्जी हॉस्पिटल, सांगली, जत, संख आणि विजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.