सामान्य माणसांनी प्रवास - खर्च कमी करायचा, भाजपचे मंत्री - नेते काय त्याग करणार ? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल
schedule13 May 26 person by visibility 32 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सामान्य माणसांनी प्रवास कमी करायचा, खर्चावर मर्यादा आणायच्या मग भाजप सरकारच्या नेतृत्वाखालील मंत्री आणि नेते मंडळी काय त्याग करणार? प्रधानमंत्री व मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द होणार का ? निवडणुकीच्या तोंडावर अर्थव्यवस्थेची वाट लावून आता जनतेला का वेठीस धरत आहात ? असा खडा सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. माजी नगरसेविका भारती पोवार, संपतराव चव्हाण - पाटील, वेदवती मोहिते, माजी नगरसेवक अमोल माने यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी येथे पत्रकार परिषद झाली.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला काटकसर करण्याचा, पेट्रोल व डिझेल कमी वापरण्याचा सल्ला दिला आहे. हा सारा प्रकार म्हणजे चोराच्या उलटया बोंबा या पद्धतीचा आहे.स्वतच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचं, महागाई नियंत्रणातील अपयशाचं खापर आता सरकार थेट जनतेच्या माथी फोडत आहे. महागाई, आर्थिक मंदी आणि इंधन दरवाढीला सरकारची धोरण जबाबदार आहेत. गेल्या काही वर्षात पेट्रोल, डिझेलवर प्रचंड कर लावून लाखो कोटी रुपये कमविले तो पैसा कुठे गेला ? तो पैसा सामान्य माणसासाठी दिलासा देण्याकरिता का वापरला जात नाही ? ’असा प्रश्न काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे.
‘सामान्य माणूस महागाईने पिचला आहे. तरुणांची स्वप्नं धुळीस मिळाली आहेत. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सरकार मात्र स्वतच्या अपयशी कारभाराचे खापर दुसऱ्यावर फोडत आहे. हे सरकार आहे की एखादी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ? फोटो काढणे, भाषण देणे आणि घोषणा करणे यापलीकडे भाजपवाल्यांना राज्यकारभार जमतो का ? सरकार म्हणून जबाबदारी कधी स्वीकारणार आहात ?’अशी विचारणा केली. भाजप सरकारच्या विरोधात आत जनतेत मिसळून प्रबोधन करण्यात येणार असल्याचेही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.