महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया १५ एप्रिल २०२४ अखेर पर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन होणार नसल्याने कलश व उत्सव मूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवून भाविकांना पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन योग्य पद्धतीने दर्शनाची सोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला कळविले होते. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विज्ञान शाखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि.१२ व १३ एप्रिल २०२४ रोजी मूर्तीची पाहणी करुन मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया १४ एप्रिल २०२४ रोजी सुरु केली आहे, अशी माहिती देवस्थान समितीने दिली आहे.