राजेश क्षीरसागरांची हद्दवाढ विरोधी सर्वपक्षीय कृती समितीला ग्वाही
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी प्रस्तावित केलेल्या गावांचा विरोध होत असल्यास त्यांची भूमिकाही समजून घेणे आवश्यक आहे. विरोधाला विरोध करून कोणत्याही समस्येचा मार्ग निघू शकत नाही. दोन्ही समित्या या कोल्हापूर जिल्ह्यातीलच असून, विकासाच्या बाजूने एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही समित्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करून त्यांची संयुक्तिक समिती स्थापन करण्याबाबत प्रयत्नशील आहे. हद्दवाढ विरोधी समितीच्या मागणीप्रमाणे प्रस्तावित हद्दवाढीचा आराखडा तयार करून दोन्ही बाजूचे एकमत करुनच हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या विषयावर सकारात्मक तोडगा काढू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावांमधील सर्व पक्षीय कृती समिती, कोल्हापूरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांची भेट घेवून निवेदन सादर केले. शिष्टमंडळात विरोधी समितीच राजू माने, बबन शिंदे, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळुंखे, सुधाकर म्ह्त्रे, शशिकांत पाटील, गजानन संकपाळ यांचा समावेश होता.यावेळी यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, विभागप्रमुख मंदार तपकिरे, कपिल सरनाईक, पियुष चव्हाण, रुपेश इंगवले उपस्थित होते.