अक्षरांच्या दुनियेतील ‘मनोहर’ प्रवास ! महापालिका शाळेत ‘लेखक आपल्या भेटीला’ सोहळा!!
schedule27 Feb 26 person by visibility 18 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शब्दांच्या गाभाऱ्यातून भावनांचे पाझर फुटले की वाचक त्या कथेशी एकरूप होतो, याचाच जिवंत प्रत्यय गुरुवारी पाहायला मिळाला. निमित्त होते, मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'लेखक आपल्या भेटीला' या अनोख्या उपक्रमाचे! कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात, इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील 'कठीण समय येता' या पाठाचे लेखक मनोहर भोसले यांनी हजारो विद्यार्थ्यांशी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.
कार्यक्रमाचा प्रारंभ ज्ञानपीठ विजेते लेखक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. विशेष म्हणजे, राजर्षी शाहू शिष्यवृत्ती परीक्षेत शहरात प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेली स्वरांगिनी विजय केंद्रे हिच्या हस्ते पूजन झाले. यानंतर लेखक मनोहर भोसले यांनी जेव्हा 'कठीण समय येता' या सत्यघटनेवर आधारित पाठाचे भावूक कथन सुरू केले, तेव्हा अवघे वातावरण स्तब्ध झाले. एका वास्तववादी संघर्षाचा प्रवास लेखकाने इतक्या समर्थपणे मांडला की, विद्यार्थीच नव्हे, तर उपस्थित मान्यवरांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
या संवादात विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. "लेखन कसे सुचते?", "पुरस्कारांचा प्रवास कसा होता?" आणि "नवोदित लेखकांनी काय करावे?" अशी प्रश्ने केली. लेखकांनी तितक्याच आपुलकीने उत्तरे दिली. श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. साताप्पा पाटील यांनी करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. रावसो कीर्तीकर यांनी सूत्रसंचालन केले. नितीन खुडे यांनी आभार मानले.या उपक्रमासाठी तंत्रस्नेही शिक्षक युवराज येरुडकर व संदीप जाधव यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमास शिक्षण पर्यवेक्षक विजय माळी व चंद्रकांत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. अजितकुमार पाटील, प्रतिभा चौगुले, विठ्ठल देवणे, संजय देसाई, शहाजी पाटील यांच्यासह भाषा समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.