महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
ग्रामपंचायत स्तरावर ,आठ जुलै ते सात ऑगस्ट २०२४ या कालावधीत स्वच्छतेचे दोन रंग, ओला हिरवा-सुका निळा संकल्पनेची मोहिम राबविणेत येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन. एस यांनी दिली आहे.
स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये जिल्हयातील सर्व गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाची आहेत. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करण्यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती करणेसाठी स्वच्छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा संकल्पना जिल्हयातील सर्व गावांमध्ये राबविणेत येणार आहे.
जिल्हयातील १०२५ ग्रामपंचायतीमध्ये प्रती ग्रामपंचायत पाच (सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही, बचत गट महिला) अशा एकुण ५१२५ इतक्या प्रशिक्षित संवादकांची निवड करुन या संवादकामार्फत गृहभेटी देवुन जनजागृती करण्यात येणार आहे. गावातील किमान पाच कुटुंबांना भेट देतानाचा फोटो गुगल फॉर्म वर अपलोड करावयाचे आहेत.
गुगल फॉर्म मध्ये भेटी देण्यात येणाऱ्या गावातील सर्व कुटुंबांची माहिती भरण्यात येणार आहे. गृहभेटी वेळी नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय आणि नियमित वापर आदि बाबत माहिती कुटुंबांना देणेत येणार आहे.मोहिमेचे सनियंत्रण तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांचे मार्फत व जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन मार्फत करणेत येणार आहे.