वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक नको - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule15 Mar 25 person by visibility 106 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वाहतूकदारांमुळे सामाजिक स्वास्थ टिकण्यास मदत होते. समाजाच्या अनेक गरजा पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक करू नये अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले .
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी - पाटील , लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, मल्हारी पाटील आदी उपस्थित होते .
बैठकीत कागल येथील खाजगी आरटीओ चेक पोस्ट बॉर्डर बंद करावी, तावडे हॉटेल जवळील 13.5 जागा राज्य शासनाने ट्रक टर्मिनल्स साठी आरक्षित केली आहे त्या जागेवर मनपाने त्वरित ट्रक टर्मिनल्स उभा करावे, ई - चालन पद्धत रद्द करावी, तसेच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची अट स्थगित करावी किंवा त्याला मुदतवाढ द्यावी याचे गुजरात राज्याप्रमाणे नंबर प्लेटच्या विक्रीचे दर ठेवावे, महामार्ग पोलिसांना पेपर तपासणीचे दिलेले अधिकार रद्द करावे अशा मागण्या लॉरी असोसिएशनच्यावतीने या बैठकीत करण्यात आल्या. या अनुषंगाने महामार्ग पोलीस , परिवहन विभागाची मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीसाठी मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह भोसले, शंभूराजे पवार विशाल बागडे, लॉरी असोशिएशनचे सचिव हेमंत डिसले खजिनदार प्रकाश केसरकर उपस्थित होते .