कोल्हापुरात लोकसभेचे तीन मतदारसंघ होणार, मुश्रीफांची कुंडली बघायला पाहिजे ! गोकुळच्या कार्यक्रमात चंद्रदीप नरकेंची टोलेबाजी
schedule30 Mar 25 person by visibility 417 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघापाठोपाठ जिल्ह्यात आगामी निवडणुकीत आणखी एक लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याला लोकसभेसाठी आणखी एक खासदार वाढणार आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनीही माहिती दिली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये गोकुळ पेट्रोल पंपाचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ झाला.
कार्यक्रमात निवेदकाने मंत्री मुश्रीफ यांना उद्देशून सहा वेळा खासदार आणि नऊ वेळा मंत्री असा उल्लेख केला. त्यांच्या या विधानाने कार्यक्रमस्थळी एकच हंशा निर्माण झाल्या. तसेच साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. निवेदनाच्या ओघात निवेदकाडून अनावधानाने झालेली चूक तत्काळ मुश्रीफ यांनी दुरुस्त करत सहा वेळा खासदार नव्हे तर सहा वेळा आमदार असे सांगितले. आमदार चंद्रदीप नरके यांनी भाषणात मुश्रीफ यांच्या संदर्भात झालेल्या उल्लेखाला अनुसरुन म्हणाले, ‘मुश्रीफ हे जरी खासदारकीला गेले तरी ते काही महाराजांच्या आडवे येणार नाहीत. कारण लोकसभेचा आणखी एक मतदारसंघ जिल्ह्यात वाढणार आहे. मात्र मंत्री मुश्रीफ त्यांनी पूर्वीच जाहीर केले आहे की, ते अजून एक टर्म आमदारकीची निवडणूक लढविणार आहेत असे त्यांनी यापूर्वीच जाहींर केले. यावरुन त्यांना अजून खासदारकीला जायचं नाही हे दिसतं. मात्र मुश्रीफ यांची कुंडली बघायला पाहिजे. त्यांच्या हातून चांगली कामे झाली आहेत. त्यांनी आमदारकीची दहावी टर्म जिंकावी आणि विधानसभेत त्यांना बघायला आम्हालाही सोबत न्यावं निवडणुकीत मदत करावी.’अशी मिश्किल टिप्पणी केली. आमदार नरके यांच्या विधानाने साऱ्यांचेच कान टवकारले.
हे लक्षात येताच आमदार नरके यांनी चटकन सावध होत, ‘महायुती आणि महाविकास आघाडी आपआपल्या ठिकाणी घट्ट आहेत, महायुती म्हणून आम्ही सारे एकसंध आहोत तर महाविकास आघाडीवाले त्यांच्या संसारात सुखात आहेत.’असा खुलासाही केला.
…………………..
नरकेंनी केले डोंगळेचे कौतुक अन् आबाजींचा काढला चिमटा
आमदार नरके म्हणाले, ‘गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे हे कर्तबगार चेअरमन आहेत. त्यांनी, महायुती आणि महाविकास आघाडीतील नेतेमंडळींना उत्तम सांभाळले आहे. दोघांमध्ये समतोल ठेवला आहे. याकामी त्यांना आबाजी अर्थात विश्वास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असणार. मात्र ज्या पद्धतीने अरुण डोंगळे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते मंडळींशी समतोल ठेवला आहे. ती वृत्ती आबाजी शिकले नाहीत.’अशी टिप्पणी आमदार नरके यांनी केली. आमदार नरके यांचे हे विधान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होते हे उपस्थितांच्या लक्षात येताच कार्यक्रमस्थळी एकच हंशा पिकला. गोकुळ दूध संघाच्या कामासाठी सरकारकडून जी मदत लागेल त्याला महायुतीचे नेते म्हणून आम्ही सारे पाठबळ देऊ असेही नरके यांनी आश्वस्त केले.