राज्यातील यापूर्वीचे सत्ताधारी चमच्याने खायचे, आताचे सत्ताधारी अख्खे भांडेच तोंडाला लावतात-आपच्या मेळाव्यात खरमरीत टीका
schedule07 Nov 25 person by visibility 87 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राज्यातील या आधीचे सत्ताधारी चमच्याने खायचे, आताचे सत्ताधारी अख्खे भांडेच तोंडाला लावतात. कोल्हापूर महापालिकेचे वार्षिक बजेट हजार कोटींवर आहे. स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी नसल्याने पाच वर्षात हजारो कोटी रुपये राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या मनमानीने खर्च केले गेले. पाच-पाच वर्षे निवडणूक न घेणाऱ्या सरकारचा हिशेब आता जनताच करेल’अशी खरमरीत अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. अभिजित मोरे यांनी केली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा कोल्हापुरात झाला. याप्रसंगी आयोजित मेळाव्यात बोलताना मोरे यांनी, ‘शहरातील नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून प्रश्न सोडवण्याचे काम आपने केले आहे. रस्ते, उद्याने, किमान वेतन यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत पक्षाने कार्यकर्त्यांचे शहरभर जाळे विनले आहे. सातत्याने नागरिकांसाठी उठवलेल्या आवाजाच्या जोरावर आप निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. या अनुषंगाने पक्षाने तयारी सुरु केली आहे. कार्यकर्ता मेळावा घेत निवडणुकीत जोमाने उतरा.
महापालिकेतील टक्केवारी गाडण्यासाठी सभागृहात पोहोचणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले कारभारी माजलेत. हा माज आता मतदाराच उतरवतील अशी टीका आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली. जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, दुष्यंत माने, प्रसाद सुतार, विजय हेगडे यांची भाषणे झाली. याप्रसंगी वसंत कोरवी, किरण साळोखे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उषा वडर, अमरसिंह दळवी, डॉ. कुमाजी पाटील, ऍड. सी. व्ही. पाटील, प्रथमेश सूर्यवंशी, लखन काझी, उमेश वडर, रमेश कोळी, चेतन चौगुले, लाला बिर्जे, बाबुराव बाजारी आदी उपस्थित होते.