महसूल विभाग सरकारचा कणा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देउन गौरव
schedule02 Aug 22 person by visibility 651 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : : महसूल विभागाचा खुप जूना इतिहास आहे. दिवसेंदिवस महसूल विभागाची रचना बदलत चालली आहे. महसूल विभागाचे महत्व ठिकवून ठेवले पाहिजे. सर्व क्षेत्रात काम करणारा महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन कार्यक्रम झाला. महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, जनसामान्यांचे काम करत असताना महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्याची काळजी करण्याबरोबरच आपल्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाच्या निकडीनुसार प्रसंगी 15 तासांहून अधिक तास काम करावे लागते. अशावेळी त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. महसूल विभागात काम करत असतांना मुलांच्या शिक्षणाकडे, स्वत:च्या आरोग्यकडे तसेच भविष्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी किशोर पवार म्हणाले, महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाची प्रतिमा सांभाळून काम करणे गरजेचे आहे. उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव सांगितले. सनदी लेखापाल भाऊसो नाईक यांनी सुरक्षित गुंतवणूकीबाबत माहिती दिली. कलाकार नितीन कुलकर्णी यांनी हसत जगण्याबाबत मनोरंजनातून मौलिक सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार सुनीता नेर्लीकर यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार अर्चना कापसे यांनी आभार मानले. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, भूसंपादन अधिकारी शक्ती कदम, भूसंपादन अधिकारी विवेक काळे, आदी उपस्थित होते.