समाजजीवनाशी एकरुप झालेले व्यक्तिमत्व, नैतिकता सांभाळणारे राजकारणी
schedule18 Sep 25 person by visibility 129 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात आदराचे स्थान मिळवलेले, राजकारण व सार्वजनिक संस्थेत काम करताना नैतिकता सांभाळत कामकाज करणारे, व्यक्तीगत कामासाठी महाापलिकेच्या साधनांचा वापर न करणारे माजी महापौर शिवाजीराव मारुतराव कदम यांचे निधन झाले. कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक, उपमहापौर आणि महापौर म्हणून लोकोपयोगी कामे करत वेगळी ओळख निर्माण केली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या मुशीत घडलेल्या कदम यांनी आयुष्यभर त्या पक्षाशी बांधिलकी जपली. विविध पक्षांच्या ऑफर्स नाकारात शेकापचा झेंडा खांद्यावर कायम ठेवला. शेतकरी सहकारी संघात संचालक व कोल्हापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी ठेवला. विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
शेतकरी कुटुंबात १९४४ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. दहावीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यांना इंजिनीअर व्हायचे होते. शिवाजी तंत्रनिकेतन टेक्निकल अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. विद्यार्थी दशेतच त्यांचा शेतकरी कामगार पक्षाशी संबंध आला. पुढे ते शेकापचे कार्यकर्ते म्हणून काम करु लागले. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा नगरपालिकेवर निवडून आले. विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. त्यांनी, १९७८ मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत विजयी होत शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकाविला.
२० ऑगस्ट १९८२ ते २० ऑगस्ट १९८३ या कालावधीत उपमहापौर होते. १९९५ ते पुन्हा महापालिकेत निवडून आले. महापालिकेत त्यावेळी ताराराणी आघाडीची सत्ता होती. ते, १७ नोव्हेंबर १९९७ ते १७ नोव्हेंबर १९९८ या कालावधीत महापौर होते. नगरसेवक व पदाधिकारी म्हणून काम करताना सदर बाजार येथे लालबहाद्दूर शास्त्री उद्यान उभारले.कोल्हापूरचा पाणी पुरवठा, कदमवाडी परिसरात स्मशानभूमी, कदमवाडी-भोसलेवाडीत प्राथमिक शाळांच्या इमारती बांधल्या. कोल्हापूर अर्बन बँकेत संचालक व अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्र सेवा दल, बालकल्याण संकुल अशा विविध सामाजिक संस्थेशी निगडीत होते. त्यांच्या समाजकारण व राजकारणाचा वारसा आज मुले सांभाळत आहेत.
दरम्यान वयोमानामुळे शिवाजीराव कदम हे गेली काही वर्षे समाजकारण व राजकारणापासून अलिप्त होते. वयाच्या ८१ व्या वर्षी गुरुवारी (१८ सप्टेंबर २०२५) पहाटे त्यांचे निधन झाले.सकाळी दहा वाजता कदमवाडी येथील स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले उद्योजक संतोष, शशिकांत, माजी नगरसेवक सत्यजित व भरत, सुना, नातंवडे, परतंवडे असा परिवार आहे.