पुणे नव्हे कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर ! पुण्यात अभिजनांना विद्या, कोल्हापुरात बहुजनांना शिक्षणाची सुविधा ! ! डॉ. मंजुश्री पवार
schedule28 Jun 26 person by visibility 54 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘पुणे नव्हे कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर आहे. पुण्यामध्ये अभिजनांना प्राधान्याने विद्या दिली जायची. याउलट संस्थानकाळात कोल्हापुरात ८० टक्के बहुजनांना शिक्षणाची सुविधा होती.यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर आहे.’असे स्पष्ट मत इतिहास अभ्यासिका प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांनी व्यक्त केले.
शाहू छत्रपती फाऊंडेशनतर्फे राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी एआयबी पुणे येथील पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले यांची प्रमुख उपस्थिती होती. लेखिका वसुधा पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे नूतन उपाध्यक्ष एम. बी. शेख व शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांचा सत्कार करण्यात आला. शाहू स्मारक भवन येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी पत्रकार गुरुबाळ माळी, शिक्षक बाबूराव जोतिबा वरपे, पांडूरंग शिवाजी पाटील, सुहास मनोहर शिंदे,श्रीरंग दिनकर अणेकर, शरद गुलाबराव जाधव, राजेंद्र नारायण चव्हाण, अरविंद तुकाराम पाटील, सागर भास्कर लकडे, सुदर्शन श्रीकृष्ण आंबी, शिक्षिका वर्षा संदीप डोईजड, गायत्री विश्वास मोहिते, सुषमा दिपक डवरी, अनुष्का अभिजीत खंबाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, मानपत्र, प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनकर मास्तर यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची मांडणी डॉ. मंजुश्री पवार यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या ‘पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर असे सगळेजण म्हणतात. मात्र पुण्यामध्ये विद्या कुणाला दिली जात होती ? तर पुण्यामध्ये अभिजनांना प्राधान्याने शिक्षण मिळत होते. त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही विद्या दिली जात नव्हती. महर्षी कर्वेंनी त्यांच्या महिला आश्रमांमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहिणीला शिक्षणासाठी घेतले नव्हते. महर्षी कर्वे महानच होते, त्यांच्या कार्याला कमी लेखण्याचा हेतू नाही. तत्कालिन स्थितीत मराठा स्त्रीला, बहुजन स्त्रीला संस्थेत घेण्याएवढं समाजमन पुढारलेलं नाही. यामुळे मी त्यांना आश्रमात घेऊ शकत नाही असे कर्वे यांनी शिंदे यांना कळविले होते. याउलट कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी ८० टक्के बहुजनांना विद्या देण्याचे, शिक्षणाच्या उपलब्धतेचे काम केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर आहे. संस्थानकाळात त्यांनी, महात्मा फुले यांच्या विचारकार्याला गती दिली.’
संस्थानकाळापासूनचे दाखले देत डॉ. पवार म्हणाल्या, ‘शाहू विचार पुढे नेण्यासाठी, जनजागृतीसाठी दोनच व्यक्ती पुढं होत्या त्या म्हणजे पत्रकार आणि शिक्षक. त्यामुळे मला असं वाटतं की समाजाला जागत ठेवण्याचे, भानावर आणण्याचे, जागते ठेवण्याचं काम हे या दोन व्यक्ती करत असतात. त्याच विचारधारेने काम करणाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतो हे समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे.’
पोलिस अधीक्षक डुबुले म्हणाल्या, ‘कोल्हापूर हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे आहे. आपण सारे खूप भाग्यवान आहोत. कारण राजर्षी शाहू महाराजांनी समाजजीवनाशी निगडीत प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले. धरण आणि शिक्षण यापलीकडे जाऊन त्यांनी समाजजीवन उंचाविण्याचे कार्य केले. ते खऱ्या अर्थाने लोकराजा होते. बहुजनांचा राजा होता. त्यांच्या अपरिचित कार्याचा, पैलूचा अभ्यास होऊन तो इतिहास नव्या पिढीसमोर आला पाहिजे. साऱ्याच सत्कारमूर्तींचे मी मनापासून कौतुक करते. शिक्षकांसमोर नवीन आव्हाने आहेत. सध्याच्या व्हाट्सअप युनिव्हर्सिटीत, मोबाइलच्या दुनियेत तरुण पिढी हरवत असताना आपले संस्कार, आपली कुटुंब पद्धती, कोल्हापूरचे वैभव टिकवायचे असतील तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे.’ लेखिका वसुधा पवार यांनी ही मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष जॉर्ज क्रूझ यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विषद केली. जावेद मुल्ला यांनी स्वागत केले. सिद्दीका मुल्ला, पत्रकार नवाब शेख यांनी सूत्रसंचालन केले. डी. डी. पाटील यांनी आभार मानले.