आजी मरुन गेली-जाताना मामाचं गावही घेऊन गेली ! भावविश्व उलगडणाऱ्या भावस्पर्शी कवितांनी अंगावर शहारे !!
schedule25 Aug 25 person by visibility 97 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रेमाच्या हळुभार भावना अलगदपणे उलगडणाऱ्या रचना, मानवी भावभावना नेमकेपणाने भाष्य करणाव्या पंक्ती तर कधी उसवत चाललेल्या नातेबंधावर फुंकर मारणारी भावस्पर्शी शेरोशायरी आणि अधूनमधून मराठी-हिंदीतील ख्यातनाम कवी-गझलकारांच्या गाजलेल्या गझलांची मेजवानी यामुळे सोमवारची सायंकाळी वेगळी अनुभूती देऊन गेली. निमित्त होतं, दिनमान साहित्य उत्सवाचं. कोल्हापुरातील राजर्षी शाहूस्मारक भवन येथे हा शब्दोत्सव रंगला. कवयित्री सुमती लांडे या संेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
मराठीतील आघाडीच्या कवींच्या सहभागामुळे ही मैफल यादगार बनली. कवी अरुण म्हात्रे यांच्या खुमासदार निवेदनाने प्रारंभापासून ही मैफल रंगतदार झाली. कवी प्रकाश होळकर यांनी, बदलत्या सामाजिक स्थितीवर भाष्य करणारी ‘कालच तर सुरु झाला पाणकळा, एका रात्रीत कशी तयार झाले वावरभर वारुळे’ही वेगळया धाटणीची कविता सादर केली. सोलापूर येथे अप्पर जिल्हाधिकारी असलेल्या मोनिकासिंग यांनी ‘क्यूँ सभी में ढूंढते हो खुबियाँ, खूबसूरत हम है यहाँ और क्या’अशी प्रेमाची साद घालणारी कविता सादर करत उपस्थितांच्या मनाचा कब्जा घेतला.
गझलकार म्हणून ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे परिचित. त्यांनी, ‘असा आडून वाऱ्यावर धरा नेम साऱ्यांवर-कर चोरी उघड आता नसे कोणी पहाऱ्यावर’ ही रचना पेश करत रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली. या मैफिलीमध्ये खरा रंग भरला तो अभिनेता मिलिंद शिंदे यांनी. ‘घर जाने का अब मन नही करता, मी ऑफिसला जायचे रोज नटून, माझे वय साठ आहे अजून धग आहे, पुढे जग आहे.’अशा वेगवेगळया विषयावरील कविता सादर करत उपस्थितांना अंतर्मुख बनविले.
डॉ. जगन्नाथ पाटील यांनी जे सुचत गेलं ते लिहित गेलो. श्रावण महिन्यात कविता केली आहे असे नमूद केले. त्यांनी, निसर्गाविषयाची काळजी व्यक्त करणारी कविता सादर केली. ‘सरत्या श्रावणात लेकीसाठी माफी’ ही कविता पर्यावरण संरक्षणाचे महत्व अधोरेखित करणारी आहे. संजीवनी तडेगावकर यांनी, ’जगण्याचे जगणे जगून झाले बाई, समजून उमजले तरी मन उजळले नाही’या कवितेतून स्त्रीमनाचे दु:ख मांडले. कवयित्री सुमती लांडे यांची ‘आजी मरुन गेली, जाताना मामाचं गावही घेऊन गेली’ही कविता रसिकमनाला स्पर्शून गेली. कवयित्री आभा बोधिसत्व यांची ‘सीता नही हूँ मैं’या कविता वेगळा विचार दर्शवून गेल्या.. तरुण कवी अपूर्व राजपूत यांच्या प्रेमकवितांनी वातावरण प्रफुल्लित केले. कवी प्रशांत मोरे यांच्या ‘बाई कष्टाच्या दु:खानं लिपाव्या भेगा गं…’या कवितेने अंगावर शहारे आले.