सुट्टीला मामाच्या गावी नव्हं टीचरच्या घरी ! विद्यार्थ्यांनी अनुभवला शिक्षिकेच्या निवासस्थानी कोहिनूर पाहुणचार !!
schedule26 Aug 25 person by visibility 1166 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :शाळेला सुट्टी म्हटलां की लहानग्याच्या हक्काचं आणि आवडीचं ठिकाण म्हणजे मामाचं गाव. ‘झुक झुक आगीन गाडी…पळती झाडे पाहू या…’म्हणत अनेकांनी मामाच्या गावची सैर केलेली. दरम्यान कणेरीवाडी विद्यालयात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवारी वेगळी अनुभूती मिळाली. शाळेला सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची बस घर न जाता थेट रवाना झाली ती वर्गशिक्षिकेच्या घरी. शहरालगत राहत असलेली ही मुले शहरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी पोहचताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.शिक्षकांसोबत गप्पा, गोष्टी, कवितांचे वाचन असा आनंदाचा वर्ग जणू भरला. शिक्षिकेच्या हातचं जेवण ही तर विद्यार्थ्यांसाठी अनोखी मेजवाणी ठरली.
शिक्षक म्हणजे फक्त शिक्षक नसतात, ते आई-वडिलांप्रमाणे मार्गदर्शक आणि पालकही असतात, याचा उत्कृष्ट आदर्श शिक्षिका लक्ष्मी पाटील यांनी घालून दिला आहे. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी शाळेतील त्या विद्यार्थीप्रिय शिक्षक. संवेदनशील मनाच्या. विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर भर. आता पाचवीत शिक्षक असलेली इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्या पहिलीपासून शिकवित आहेत. वर्गशिक्षिका म्हणून वेगळं नातं तयार झालेलं.
‘शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांशी जोडलेली ममतेची नाळ देखील असते.’ या भावनेने त्या शिक्षकी पेशा सांभाळत आहेत. ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे त्यांची बदली कणेरीवाडी येथून पिराचीवाडी येथे झाली आहे. काही दिवसात्या नवीन ठिकाणी रुजू होणार आहेत. दरम्यान पाच वर्षे हाताखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यापासून आता अंतर वाढणार ही बाब मनाला चटका लावणारी असली तरी विद्यार्थ्यांबरोबर काही आनंदाचे क्षण अनुभवावेत, या हेतूने त्यांनी एक स्तुत्य निर्णय घेतला. पाचवीत शिकणाऱ्या साऱ्या विद्यार्थ्यांना घरी आणून पाहुणचार करण्याचे ठरविले.त्यांनी स्वतः मोठ्या वाहनाची व्यवस्था करून सगळया विद्यार्थ्यांना कोल्हापुरातील पाचगाव परिसरातील कोहिनूर निवासस्थानी नेले.
विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गप्पा यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. मुलांना स्वादिष्ट फ्रुटखंड पुर्या-भाजी, भात, आमटी, पापड यासारख्या मिष्टान्न भोजनाने पाहुणचार दिला.यामध्ये त्यांचे पती बाजीराव आणि मुले देखील विद्यार्थ्यांच्या सेवेत रमले होते. रात्रीच्या सुखद आठवणी मनी साठवत मुले उशिरा झोपी गेली. मंगळवारची सकाळही त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरणारी. शिक्षिका पाटील यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून सगळया मुलांना शाळेसाठी तयार केले. सर्वांना नाश्ता दिला. जेवू घालून मोठ्या वाहनाने पुन्हा शाळेत नेले. पाहुणचार, शिक्षिकेच्या घरी मुक्काम अन् आनंददायी मेजवाणी हे सारं पाहून मुलांच्या ओठावर आपसूक शब्द उमटत होते ‘आजचा दिवस माझा…’