महिला शेतीकामात होत्या तोपर्यंत आजारांच्या समस्या कमी होत्या
schedule26 Mar 26 person by visibility 18 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारतातील महिला जोपर्यंत शेतीमध्ये लक्ष घालत होत्या तोपर्यंत घरातील कोणत्याही व्यक्तीला शारीरिक आजार कमी होत होता. कारण शेतीमध्ये आंतरपिकाच्या माध्यमातून विविध औषधी वनस्पतींची लागवड महिलांकडून होत होती.जस जशा महिला शेतीपासून दुरावत गेल्या तस तशा घरामध्ये अनेक आजारांच्या समस्या वाढत गेल्या. घरातल्यांनी काय खाल्ले पाहिजे याबाबतीत महिला सजग होत्या’असे मत मोआ अॅग्रोटिकचे कार्यकारी संचालक डॉ. मल्लिकार्जुन कोरी यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कै.शिवाजीराव देसाई स्मृती प्रित्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या व्याख्यानमालेचे हे २० वे वर्ष आहे. ‘समृद्ध माती- समृद्ध जीवन’ हा व्याख्यानाचा विषय होता. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, रजिस्टर डॉ दत्तात्रय साठे यावेळी उपस्थित होते.
कोरी म्हणाले,“ भारताचे पूर्वीचे शिक्षण हे जमिनीशी नाते जोडणारे होते तोपर्यंत भारतातील शेती ही उपजाऊ तसेच विविध प्रकारच्या पिकांसाठी अत्यंत गुणकारी होती.जसे जसे आपले शिक्षण ऑइल,केमिकल यांच्याशी जोडले गेले तसे तसे आपले जमिनीकडील लक्ष कमी होत ते खनिज पदार्थाकडे केंद्रित केले गेले. भारतातील शेतीच्या मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस ज्या पद्धतीने ढासळत चाललेली आहे. केमिकल युक्त शेतीच्या प्रभावाने निसर्गाचे सर्वच चक्र उलटून पालटून टाकलेली आहे त्यामुळे अनेक रोगांनी आज मनुष्याचे जीवन भरलेले आहे. आपल्या जीवनशैलीत साखर, रिफाइंड ऑइल, मीठ, दूध यांचा तुम्ही उपयोग करू नये’अशा प्रकारचा आग्रह त्यांनी उपस्थितांना केला.
कुलसचिव डॉ.शिंदे यांनी शेती, पीक व्यवस्थापन,आहारशास्त्र या सर्व विषयात भारतीय विचारधारेला बाजूला करून परकीय लोकांची विचारधारा अवलंबल्यामुळे सध्याची जल,जमीन,वायू यांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली असल्याबद्दल सांगितले. संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दीप्ती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.नीता पाटील यांनी आभार मानले. प्रा.अमर टिकोळे हे कार्यक्रमाचे समन्वयक होते.