वास्तववादी इतिहास लेखन करणारा इतिहासकार हरपला
schedule26 Mar 26 person by visibility 52 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वस्तुनिष्ठ आणि दस्ताऐवजावर आधारित वास्तववादी इतिहास लेखन करणारे, शाहू विचारांच्या प्रसार व प्रचारासाठी आयुष्यभर काम केलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांचे गुरुवारी (२६ मार्च २०२६) निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षाचे होते. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर गेली दीड महिने उपचार सुरू होते. निधनाने शाहू विचारांचा इतिहासकार हरपला अशा भावना व्यक्त होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘डॉ जयसिंगराव पवार यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य असा ठेवा उपलब्ध झाला. त्यांच्या निधनामुळे आपण इतिहास संशोधन क्षेत्रातील तत्वनिष्ठ, व्यासंगी मार्गदर्शकाला मुकलो आहोत. डॉ. पवार यांनी इतिहास संशोधन आणि अभ्यासाला वाहून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा अनेक अंगांनी वेध घेणारी मांडणी त्यांनी केली. विशेषतः शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखन, संशोधन- प्रकल्पांना चालना दिली. त्यामुळेच शिवचरित्रासह, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब ते महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू यांच्याविषयी विपुल संदर्भ साहित्याची निर्मिती झाली.’असे म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, ‘महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरपला’अशी भावना व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील एक प्रामाणिक, अभ्यासू आणि तपस्वी व्यक्तिमत्त्व आपण गमावले असून, त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील,’ असेही आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
डॉ. पवार हे मूळचे सांगली जिल्ह्यातील तडसर येथील. शेतकरी कुटुंबांत जन्मलेले. दहावीनंतर शिक्षणासाठी कोल्हापुरात आलेल्या पवार यांची कारकिर्दी करवीरनगरीत घडली. डॉ. पवार यांनी विपुल लेखन केले आहे. शिवकालीन इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. ते येथील छत्रपती शहाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांच्या पुढाकारामुळे राजर्षी शाहू छत्रपती यांचे कार्य इंग्रजीसह, अन्य विदेशी तसेच भारतीय भाषांमध्ये पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि,महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील संशोधन मार्गदर्शक ठरले आहे. कोल्हापुरातील साहित्य, संशोधन, प्रबोधनवादी कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. विविध संस्थांशी ते निगडीत होते. गाढा अभ्यास व वास्तवादी लेखन ही त्यांची खासियत होती. 'राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरले. शाहू स्मारकाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. डॉ. पवार यांनी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून शाहू संशोधन कार्याला चालना दिली. डॉ. पवार यांच्या निधनाचे वृत्त कळतदा जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण केले. तसेच कुटुंबीयांशी संवाद साधला.