जिल्हा परिषदेसाठी सभापती, सदस्यांसह नातेवाईकांचेही अर्ज दाखल
schedule19 Jan 26 person by visibility 42 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसाचा अवधी उरला आहे. २१ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दरम्यान जिल्हा परिषदेसाठी सोमवारी, १९ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणी शक्तीप्रदर्शन केले तर कोणी साध्या पद्धतीने अर्ज दाखल केला.
जिल्हा परिषदेतील बांधकाम समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी जनसुराज्य शक्तीपक्षाकडून शित्तूर उर्फ वारणा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बांबवडे मतदारसंघातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड यांच्या पत्नी राजकुंवर यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलाा. याच मतदारसंघातून जनुराज्यकडून विष्णू यादव यांचा उमेदवारी अर्जआहे.सरुड मतदारसंघातून बांधकाम समितीचे माजी सभापती हंबीरराव पाटील यांचे चिरंजीव अमर हे निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गगनबावडा तालुक्यातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज भरला नाही. पन्हाळा तालुक्यातूनही विविध मतदारसंघातून डॉ. जयंत पाटील, भगवान पंडित पाटील, वैशाली सुरेश पोवार यांनी अर्ज भरले आहेत.
भुदरगड तालुक्यातून गारगोटी मतदारसंघातून माजी सदस्या रेश्मा राहूल देसाई, पिंपळगाव मतदारसंघातून विद्या कुंभार, आकुर्डे मतदारसंघातून माजी सदस्य जीवन पाटील यांच्या कन्या प्राची पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. राधानगरी तालुक्यातही शक्तीप्रदर्शन करत काही उमेदवार जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरले. भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीची तयारी करत असलेल्या ऋतुजा पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेश भोईटे, राजेंद्र भाटळे, संयोगिता रणधीर मोरे यांनी उमेदवार अर्ज भरले. कागल तालुक्यात सिद्धनेर्ली मतदारसंघातून शिक्षण समितीचे माजी सभापती अंबरिश घाटगे यांच्या पत्नी सुयशा घाटगे, म्हाकवेतून नितीन पाटील, सेनापती कापशी मतदारसंघातून शिल्पा शशिकांत खोत, अश्विनी माळी यांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी व बुधवारी हे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत.सगळयाच पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.