आबाजींची अमृतमहोत्सवी फटकेबाजी, चंद्रदीप नरकेंवर पलटवार ! गोकुळ निवडणुकीसाठीही फटाके !!
schedule14 Apr 25 person by visibility 303 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मी कधीच वाढदिवस साजरा करत नाही, आज पहिल्यांदाच वाढदिवस साजरा झाला. आतापर्यंतचे सारा बॅकलॉग भरुन निघाला. सर्वांचे मी आभार मानतो.’अशा शब्दांत गोकुळचे माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
त्याचवेळी त्यांनी, ‘राजकारणातू निवृत्त होण्याची ७५ वर्षासाठीची अट माझ्यासाठी नाही. रशियात ७५ वर्षानंतर सत्तेवर बसवितात. जर्मनीत ८० वर्षानंतरही पोप निवडतात. तेव्हा माझ्या राजकीय निवृत्तीवरुन चंद्रदीप नरके यांनी काही काळजी करू नये. मी, तुमच्या आजोबांच्यासोबत (डी. सी. नरके), चुलते (अरुण नरके), आता तुमच्यासोबत आणि पुढे तुमच्या मुलासोबतही गोकुळमध्ये काम करत असणार.’असा पलटवार केला. यावेळी कार्यक्रमस्थळी हास्याचे फटाके फुटाले. संचालक पाटील यांनी आगामी गोकुळच्या निवडणुकीत आपणच केंद्रस्थानी असू हेच सूचित केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पवार पाटील, के. पी. पाटील, राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, सरपंच सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आबाजींचा ७५ वा अमृतमहोत्सव वाढदिवस साजरा करण्यात आला. शिरोली दुमाला येथील शाळेच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात मंत्री मुशीफ, आमदार नरके व गोकुळचे संचालक विश्वास पाटील यांनी फटकेबाजी केली.
सत्काराला उत्तर देताना विश्वास पाटील हे काही वेळेला भाविनक झाले. माझ्या जडणघडणीत आई जनाईचे फार श्रेय आहे. मी दहा वर्षाचा असताना, वडिलांचे निधन झाले. याप्रसंगी काका एकनाथ पाटील मदतीला धावले. शेती सुरळीत करुन दिली. बाबूराव पाटील, आनंदराव पाटील आदींनी ग्रामपंचायत निवडणुकीला उभे केले. सदस्य झालो, उपसरपंच केले. येथूनच माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, खासदार बाळासाहेब माने, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे, एस. आर. पाटील, आनंदराव पाटील, आमशीकर गुरुजी, शामराव पाटील या साऱ्यांची मदत झाली. मी काहींही नसताना, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मला मोठे केले. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझ्या वाटचालीत नेत्यांचा सहभागही महत्वाचा राहिला. आनंदराव पाटील चुयेकर यांनी गोकुळमध्ये संधी दिली. मी त्या संधीचे सोनं केले.’
गोकुळमधील कारकिर्दीविषयी बोलताना आबाजी म्हणाले, ‘संचालक, चेअरमन म्हणून काम करताना श्रद्धेपूर्वक काम केले.सगळयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दूध उत्पादन वाढीसाठी वासरु संगोपन योजना आणली. शेतकरी, पूर्वी बाजारात वासरु विकायचं. यासंबंधी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वासरु संगोपनासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले तर ते त्याचे पालन करतील असा पर्याय पुढे आला. वासरु संगोपन योजना सुरू केली आणि कायापालट होत गेला.’
अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करणाऱ्या आबाजींनी आता प्लास्टिकमुक्तीसाठी काम करण्याचे ठरविले आहे. प्लास्टिक कचरा संपुष्टात आणण्यासाठी प्रकल्प राबवित आहे. केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे.पर्यावरण संवर्धनसाठी आपण काम करत राहू’असे स्पष्ट केले.
भाषणात मंत्री मुश्रीफ यांनी आबाजी आणि अरुण डोंगळे म्हणजे जय –विरुची जोडी असल्याचा उल्लेख केला. तसेच आबाजींचे ठरावधारकांशी चांगले संबंध आहेत. गोकुळची निवडणूक कोणीही माझ्याशिवाय जिंकू शकत नाहीत अशी वातावरण निर्मिती करतात’असा उल्लेख केला. तर आमदार नरके यांनी, आबाजींची कार्यक्षमता पाहिली तर आणखी काही वर्षे ते गोकुळमध्ये काम करत राहणार हे स्पष्ट आहे. निवृत्तीसाठी ७५ वर्षाची अट त्यांना लागू नाही. ’असा उल्लेख केला होता. त्या विधानावरही आबाजीने शाब्दिक कोटया करत शिरोली दुमाला येथील मैदान जिंकले.