महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :“बहुमताइतके संख्याबळ नसतानाही सभागृहात बिन आवाजाचा बाँम्ब फोडत महापौर होणारे, नगरसेवक या नात्याने सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारे, प्रशासनावर वचक ठेवत शहर विकासाचा अजेंडा राबविणारे, सर्वसामान्य न्याय मिळवून देणारे लोकप्रतिनिधी म्हणजे माजी महापौर बाबू फरास होय. जातीधर्माच्या पलीकडे जाउन काम करणाऱ्या बाबू फरास यांनी कामकाजातून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. अशा जनताभिमुख महापौराची पोकळी कायम जाणवत राहील.” अशा शब्दांत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धाजंली वाहिली.
महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आयोजित शोकसभेत अनेकांनी माजी महापौर बाबू फरास यांच्या आठवणी जागविल्या. आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.२२) सायंकाळी शोकसभा झाली. याप्रसंगी पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष सुभाष सरनाईक,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवान राजशेखर मोरे यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. आमदार मुश्रीफ यांनी जवान मोरे यांच्या कुटुंबीयांना सहकार्य म्हणून एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. खासदार धनंजय महाडिक यांनी फरास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पाठविलेल्या शोकसंदेशचे वाचन करण्यात आले.
माजी महापौर महादेवराव आडगुळे, माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक अशोक भंडारी यांनी त्यांच्यासोबतचे मित्रत्वाचे नाते उलगडले. मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, कादर मलबारी, फिरोज पठाण, फारुख कुरेशी, जयकुमार शिंदे, काम्रेड दिलीप पवार, शेकापचे संभाजी जगदाळे, बालगोपाल तालीम मंडळाचे आप्पासाहेब साळोखे, केएमटी कामगार युनियनचे निशिकांत सरनाईक, शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी फरास यांच्याशी निगडीत आठवणी सांगितल्या.
सामाजिक कार्यकर्ते अशोक पोवार यांनी बाबू फरास यांच्या नावांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करावे असे मत मांडले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण पहिल्या सभागृहात घडलेल्या महापालिकेतील घडामोडी, फरास कुटुंबीयांशी चव्हाण कुटुंबीयांचा स्नेह उलगडला. कर्मचारी संघटनेचे संजय भोसले यांनी फरास यांच्या कालावधीत केएमटीला मिळालेले सहा कोटी, शिंगणापूर पाणी योजनेतील त्यांचा पुढाकार या घटनांना उजाळा दिला. आमदार जयश्री जाधव, आमदार मुश्रीफ यांनी फरास हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते, शहर विकासात त्यांचे योगदान मोठे आहे’असे नमूद केले.
यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, राजू लाटकर, माजी उपमहापौर संभाजी देवणे, परीक्षित पन्हाळकर, महेश सावंत, अर्जुन माने, अनिल कदम, ईश्वर परमार, तौफिक मुल्लाणी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सुधाकर चल्लावाड, कुमार जाधव, किशोर घाटगे, उमेश रणदिवे, कुमार जाधव, किशोर घाटगे, अभय तेंडूलकर, रणजित जाधव आदी उपस्थित होते. विजय वणकुद्रे यांनी सूत्रसंचालन केले.