ज्या क्षेत्रात काम करताय त्यावर मनापासून प्रेम आवश्यक -स्पृहा जोशी
schedule04 Dec 23 person by visibility 610 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “‘सोशल मीडिया ही एक खूप वर-वरची गोष्ट असून प्रत्यक्ष संपर्काला आजही तोड नाही. स्पर्धेच्या जगात यश किंवा अपयश आले तरी डोके ताळ्यावर ठेवून त्याला सामोरे जाणे व काम करणे महत्त्वाचे आहे. जे काम करतोय त्यावर मनापासून प्रेम असणे गरजेचे असते. माझ्या सुदैवाने मला जे करायला आवडते तोच माझा व्यवसाय आहे त्यामुळे मला माझ्या कामातून आनंद मिळतो आणि मी एकाच वेळी निवेदन, कविता, अभिनय अशा सर्व गोष्टी यशस्वीपणे करू शकता”असे मत अभिनेत्री व निवेदिका स्पृहा जोशी यांनी व्यक्त केले.
केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयामध्ये 'अभिग्यान पूर्वरंग २०२३' अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्पृहा जोशी या उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांची प्रकट मुलाखत झाली. प्रा. क्षितीजा ताशी यांनी मुलाखत घेतली.
‘बालमोहन आणि रुईया कॉलेज व तेथील विविध उपक्रम यांमुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढला आणि माझ्या जडण-घडणीतही त्याचा मोलाचा वाटा आहे. शाळा कॉलेजमधील शिक्षणास ‘जगण्याचा पाया’ आहे. ‘पुस्तकांपासून लांब गेल्यास आयुष्यातील बऱ्याच गोष्टींना आपण मुकतो’ असेही त्यांनी नमूद केले.
अभिनय क्षेत्राबाबत बोलताना त्या म्हणाल्या,‘ अभिनय क्षेत्रात फक्त अभिनय येता कामा नये तर, अभिनयाचा अभ्यास करता येणे महत्वाचे आहे. ज्या भाषेमध्ये अभिनय सादर केला जातो त्या भाषेवर प्रभुत्व असणेही गरजेचे आहे’.
कार्यक्रमात वॉक विथ वर्ल्ड समिती ची माहिती विद्यार्थी समिती अध्यक्ष सोहम पागेने दिली. अभिग्यान २०२३ कार्यक्रम प्रमुख राज यादव याने अभिग्यानची माहिती दिली.कार्यक्रमास केआयटी संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ. एम.एम. मुजुमदार, विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भाट, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अक्षय थोरवत, प्राध्यापक सहसमन्वयक प्रा.प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. वृषाली देसाई, सुजल माळी आणि अमेय कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. समर्थ बकरे आणि सानिका वेंगुर्लेकर यांनी आभार मानले.