जिल्ह्यातील साखर कारखान्यांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार- हसन मुश्रीफ
schedule18 Apr 25 person by visibility 72 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : साखर कारखानदारीसमोर अनेक प्रश्न उभे ठाकत आहेत. साखर कारखानदारी संकटात आहे. गेल्या दहा वर्षात एफआरपीमध्ये झालेली वाढ, साखर दरवाढीचा अभाव असे विदारक चित्र आहे. जिल्ह्यात जवळपास ३६ कारखाने आहेत. कारखानदारीची सध्य स्थिती समोर येण्यासाठी येत्या महिनाभरात सगळया कारखान्यांची श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे असे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी मार्केट यार्ड येथील कार्यालयात झाला. याप्रसंगी बोलताना त्यांनी साखर कारखानदारी, सहकारी संस्थेतील निवडणुका, कृषी क्षेत्रात एआयचा वापर अशा विविध गोष्टीवर ऊहापोह केला. ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर अवलंब करावा लागणार आहे. साखर कारखानदारीसाठी एआय हा आशेचा किरण आहे. बारामतीमध्ये ऊस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना सगळी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.
एआयचा अवलंब केल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होणार आहे. भविष्यात पेट्रोलचा वापर कमी होण्याची चिन्हे आता दिसत आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरू आहे. यामुळे इथेनॉल मिश्रणावरही मर्यादा येणार आहेत. सौरऊर्जा प्रकल्पावर भर आहे. यामुळे साखर कारखान्याचे वीज कोण घेणार ? या साऱ्या बाबींचा विचार करुन एआयसारख्या नव तंत्रज्ञानाचा स्वीकार साऱ्यांनी केला पाहिजे. ऊस उत्पादनात वाढ करावी लागणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
…………….
लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार, पण योग्यवेळी
मुश्रीफ म्हणाले, ‘मुख्यमंत्री लाडक्या बहिण योजनेंतर्गत दरमहा २१०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. पण ही रक्कम योग्य वेळी जमा केली जाईल. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका आहेत. २१०० रुपये जमा केले नाहीत तर मते कशी मिळतील ? याची जाणीव सरकारला आहे. योग्य वेळी २१०० रुपये देऊ. विरोधकांनी योजनेवरुन कितीही अफवा पसरविल्या तरी ही योजना बंद होणार नाही. विकासकामांसाठी निधीची तरतूद केली आहे. विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही.’