महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे संपल्याने आचारसंहिता शिथील करून राज्यातील जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना द्यावेत या मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने नुकतेच ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना दिले.
निवेदनावर संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत टिपुगडे आदींच्या सह्या आहेत.
११ मार्च २०२४ च्या शासन पत्रानुसार नवीन नियुक्तीपूर्वी शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिलेले होते. दरम्यान लोकसभा आचारसंहिता सुरू झाल्याने जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया थांबली होती. वीस मे रोजी राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे संपल्याने महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथील झाली आहे. राज्यातील जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना द्यावेत अशी मागणी संघटनेने केली आहे.
तसेच सरकारच्या वित्त विभागास सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रूटी दूर कराव्यात, शालेय शिक्षण विभागास सर्व शाळांना इयत्ता ५ वी व ८ वी वर्ग विना अट जोडावेत, संचमान्यता निकष अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा आदी मागण्या केल्या आहेत.