महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : दसरा-दिवाळीला करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत झाला. त्यानुसार परिसरामध्ये दुचाकी व रिक्षाला परवानगी असेल. शिवाय व्यापाऱ्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत करता येईल असे ठरले.
बुधवारी, सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, करवीर तहसीलदार शीतल भांबरे-मुळे, शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, वाहतूकच्या स्नेहा गिरी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, अतिक्रमण विभागप्रमुख सचिन जाधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड म्हणाले, ‘बॅरिकेटिंगमुक्त महाद्वार रोड केल्यास सर्वच व्यावसायिकांचा व्यवसाय होईल.’ माजी नगरसेवक किरण नकाते यांनी प्रशासनाने नेहमीच व्यापाऱ्यांना सहकार्य केले आहे. यावेळीही सहकार्य करून सर्वांना मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुख, जुना राजवाडा निरीक्षक, अशा सर्वांना निवेदन देऊन व्यवसायावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली आहे. त्यावेळीही सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.’हे निदर्शनास आणले.
चर्चेअंती प्रशासनाने दसरा-दिवाळीमध्ये महाद्वार रोड परिसरातील रस्ते खुले करण्यास परवानगी दिली. भाऊसिंगजी रोड, गुजरी ते रंकाळा रोड, महाद्वार रोड (बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी) ताराबाई रोड, जोतिबा रोड, राजोपाध्ये बोळ, बाबूजमाल रोड (अंबाबाई मंदिर परिसर) या परिसरामध्ये दुचाकी व रिक्षाला परवानगी असेल. त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत करता येईल असे ठरले.
बैठकीला यावेळी सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, संचालक शिवाजी पाटील, अशोक ओसवाल, विजयकुमार भोसले, कुलदीप गायकवाड, कुमार ओसवाल, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, महाद्वार व्यापारी असोसिएशनचे जयंत गोयानी, मनोज बहिरशेट, सत्यजित सांगावकर, अमित केसवाणी, दीपक बागल उपस्थित होते.
…………………..
बैठकीतील प्रमुख मुद्दे
अतिक्रमणविरोधी मोहीम दिवसभरात दोनवेळा चालेल. परिसरातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यात येणार.
महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारणार. मालाची चढ-उतार रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत.
व्यापाऱ्यांच्या दारातील बॅरिकेटिंग सणाच्या कालावधीत हटवणार. प्रशासनालाही व्यापाऱ्यांच्या वतीने सहकार्य.