दक्षिणमधील तेरा गावाची जलजीवन योजना रखडली ! ! पाण्यासाठी घागर मोर्चा, कंत्राटदाराला पाण्याची आंघोळ ! !
schedule07 May 26 person by visibility 61 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावासाठी मंजूर जलजीवन योजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे, नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी, सात मे २०२६ रोजी घागर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. तेरा गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व नागरिकांचा सहभाग होता. काँग्रेसचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. प्राधिकरण कार्यालय येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मेघा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत अपुऱ्या कामाविषयी चर्चा सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना पाण्याची आंघोळ घातली.
ऋतुराज पाटील यांच्या आमदारकीच्या कालावधीत तेरा गावासाठी २०२२- २३ मध्ये जवळपास ३५० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती २७ महिन्यात या योजनेचे काम पूर्ण करायचे होते. मात्र मुदतीत योजना पूर्ण झाली नाही, यामुळे तेरा गावच्या लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एकत्र येऊन गुरुवारी घागर मोर्चा काढला. महिला घागरी डोक्यावर घेत मोर्चात उतरले.‘पाण्यात सुद्धा राजकारण - महायुती सरकारचे भ्रष्ट धोरण, पाणी आमच्या हक्काचं-आमच्या जीवन मरणाचं, अपुऱ्या पाणी टाक्या कधी पूर्ण करणार, भ्रष्ट आणि माजलेला ठेकेदार असला कसला तुमचा कारभार, कंपनीचे नाव मेघा यांचे काळे कारनामे बघा’या मजुकराचे फलक लक्ष वेधून घेत होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पाणी पुरवठा योजनेच्या कामास होणाऱ्या विलंबावरुन टीकास्त्र सोडले. ‘आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी, आमदार असताना योजना मंजूर करुन आणली. या कामाचे श्रेय आम्हाला मिळू नये यासाठी राज्य सरकार आणि मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुद्दाम काम रखडवत आहे. मुदतीत योजना पूर्ण झाली नाही तर आणखी मोठे आंदोलन करू. तेरा गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी सध्याच्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनासोबत किती बैठका घेतल्या ? ’असा सवाल त्यांनी केला. ‘योजनेंतर्गत २७ पाण्याच्या टाक्यांची उभारणी करायची आहे, आतापर्यंत केवळ सहा टाक्या बांधले आहेत. योजनेचे काम कधी पूर्ण करणार ? अशी विचारणा त्यांनी केली. यावेळी मेघा कंपनीचे प्रतिनिधी नितीन माने यांनी,‘ पाणी पुरवठा योजनेचे काम ५१ टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०२७ पर्यत उर्वरित काम पूर्ण होईल.’असे सांगितले.
कंपनी प्रतिनिधींच्या या उत्तरावर उपस्थितांचे समाधान झाले नाही. कंपनीच्या प्रतिनिधीवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. काम पूर्ण करण्यासंदर्भात लेखी हमी दिल्याशिवाय कार्यालयाच्या आवारातून बाहेर पडणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.याप्रसंगी सरपंच निशांत पाटील, मयूर पाटील, दत्तात्रय पाटील, रोहन पाटील, तुषार देसाई आदी कार्यकर्त्यांनी ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींला पाण्याने आंघोळ घेतली. यावेळी जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय पाटील, प्रभाकर गायकवाड, आर. एन. मेस्त्री उपस्थित होते. यावेळी कंपनी प्रतिनिधींनी मार्च २०२७ पर्यत जलजीवन योजनेचे काम पूर्ण करू असे लेखी पत्र दिले.
मोर्चासमोर उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, मुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे, सरपंच उत्तम आंबवडे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील आदींची भाषणे झाली. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे माजी संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले, प्रकाश पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, डॉ. शिल्पा हजारे, अनिता कांबळे, संगीता यादव, सरपंच ए. व्ही. कांबळे, चंद्रकांत डावरे, रुपाली कुसाळे, सुमन गुरव, शुभांगी अडसूळ, प्रियांका पाटील, राधिका खडके, जहिदा इनामदार, शैलेजा भोसले, प्रताब चंदवानी, बाबासो माळी, आशिष पाटील, संजय शिंदे, संग्राम पोवाळकर, विनोद हुजुरानी, किर्ती मसुटे, रावसाहेब पाटील, सचिन देशमुख, दत्ता भिलुगडे आदींचा सहभाग होता.
...............
“भर उन्हात, डोक्यावर घागरी घेऊन महिला वर्ग रस्त्यावर उतरला आहे. प्रशासनाला नागरिकांच्या हिताची काळजी आहे की नाही असा प्रश्न पडत आहे. पाण्यासाठी आंदोलन करायची वेळ का आणली ? योजना मुदतीत का पूर्ण केली नाही ? प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन योजनेचे काम पूर्ण करावे. ”
- डॉ. शिल्पा संदीप हजारे, पंचायत समिती सदस्य