‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखात
schedule28 Aug 26 person by visibility 27 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘कोल्हापूरचे महापौर हे पुस्तक केवळ महापौरांची ओळख घडविणारे पुस्तक नव्हे तर गेल्या पाच दशकाचा शहराचा सामाजिक, राजकीय घटनांचा वेध घेणारी साहित्यकृती आहे. महापालिकेतील राजकारणाचा उलगडा करताना बदलल्या शहराची स्पंदने या पुस्तकाने टिपली आहेत. या पुस्तकातून कार्यकर्त्यांची नगरसेवक ते महापौरपदापर्यंतची जडणघडण समोर आणताना नेतेमंडळींचा शहरविकासाचा दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे. या पुस्तकातून कोल्हापूरच्या गेल्या पन्नास वर्षाहून अधिक कालखंडाचा सामाजिक, राजकीय क्षेत्राचा प्रवास उलगडला आहे ’असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
निमित्त होतं, ‘कोल्हापूरचे महापौर’या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशनचे. माजी महापौर, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी, २८ ऑगस्ट २०२६ कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जीवन गौरव पुरस्कार वितरण, निष्ठावंत पुस्तिकेचे पुर्नप्रकाशन आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम झाला. खासदार शाहू महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी पत्रकार गुरुबाळ माळी, आप्पासाहेब माळी व सतिश घाटगे लिखित ‘कोल्हापूरचे महापौर’या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन लेखकांचा सत्कार करण्यात आला. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम झाला. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. स्वर्गीय माजी महापौर प्रल्हाद चव्हाण प्रतिष्ठान व कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग असोसिएशनमार्फत कार्यक्रमाजे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर माजी महापौर सागर चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण, नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांनी पुस्तकाचे मुकतकंठाने प्रशंसा केली. ’‘कोल्हापूरचे महापौर’या पुस्तकात महापालिकेच्या ५५ वर्षातील ५१ महापौरांची एकत्रित माहिती आहे.महापालिका स्थापनेपासून ते २०२६ पर्यंतच्या महापौराचा इतिहास उलगडला आहे. पक्षीय राजकारणासोबतच महापालिकेच्या माध्यमातून शहराला लाभलेला विकासाचा चेहरा पुस्तकातून ठळकपणे मांडला आहे. महापालिकेतील राजकारण, महापौर निवडीवेळच्या घडामोडी, नगरसेवकातील कुरघोडी, नेतेमंडळीची प्रतिष्ठा या साऱ्या बाबी वस्तुनिष्ठपणे व रंजकपणे मांडल्या आहेत. यामुळे पुस्तक वाचनीय बनले आहे.’अशा भावना उपस्थितांनी केल्या.
आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील, उपमहापौर अक्षय जरग, ऑल इंडिया मंडप व डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष दडूशेठ पुरोहित, उपाध्यक्ष राहूल मनोत, पश्चिम महाराष्ट्र चेअरमन सुनील माळी, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिल्पा सोनुले, नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे,अभिजीत खतकर, अमर समर्थ, दुर्वास कदम, अश्किन आजरेकर, सचिन शेंडे, अर्चना कोराणे, प्रतिज्ञा उत्तुरे, राहुल माने, मुश्ताक मलबारी, कॉम्रेड चंद्रकांत यादव, माजी नगरसेवक रवींद्र आवळे, विजय सुर्यवंशी, प्रा. सुरेश ढोणुक्षे, प्रकाश चौगुले, भैया शेटके, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रल्हाद पाटील व प्रा. अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले