बँकेचे माजी चेअरमन राजाराम वरुटे व माजी संचालकांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ दि प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर झाल्यापासून नवीन संचालक मंडळ सूडबुद्धीने वागत आहे. मागील संचालक मंडळाचे नाव खराब करण्यासाठीच विद्यमान संचालक मंडळाने अहवाल सालात शिल्लक नफा शून्य दाखविला आहे. वास्तविक आमच्या काळात बँकेला दोन कोटी ३८ लाख रुपयांचा नफा झाला आहे. लाभांश हा सभासदांच्या हक्काचा आहे. सभासदांना आम्ही लाभांश मिळवून देणारच,प्रसंगी त्यासाठी कायदेशीर लढाई करू’असा पलटवार शिक्षक बँकेतील विरोधी आघाडीच्या नेते मंडळींनी केला.
शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजाराम वरुटे, दिलीप बापट, बाजीराव कांबळे, माजी संचालक प्रसाद पाटील, लक्ष्मी पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी मंडळीच्या कारभारावर निशाणा साधला.
‘शिल्लक नफा शून्य दाखवून विद्यमान संचालक मंडळांला दोन कोटी ३८ लाख रुपये ही रक्कम स्वतसाठी वापरायची आहे. मात्र सभासदांना लाभांशपासून वंचित ठेवण्याचा प्रकार चुकीचा आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या या कामकाजाच्या विरोधात सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत, मंगळवारपासून चौकशी करणार असल्याचे आयुक्त कार्यालयाने सांगितले आहे’असे वरुटे यांनी सांगितले.
विद्यमान संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने नफा विभागणी करत शिल्ल्क नफा शून्य दाखविला आहे. यासंबंधी सभासदामध्ये आम्ही जागृती करत आहोत. सभासदांनी सर्वसाधारण सभेत नफा विभागणीचा विषय नामंजूर करावा असे आवाहन करत आहोत. सत्ताधारी मंडळींनी हा विषय रेटला तर कोर्टात दाद मागू, कायदेशीर लढाई करू असे राजाराम वरुटे व प्रसाद पाटील यांनी सांगितले. लेखापरीक्षकाने नफा मान्य केला आहे, बँकेला अ ऑडिट वर्ग मिळाला आहे तो ही आमच्या काळातच असेही मागील संचालकांनी सांगितले.
‘बँकेतील सत्ताधारी मंडळींनी हिम्मत दाखवून सभासदांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. मागील संचालक मंडळाला बदनाम करण्याचा खटाटोप करू नये.’असा टोला माजी संचालिका लक्ष्मी पाटील यांनी लगाविला.
बँकेच्या विद्यमात सत्ताधाऱ्यांनी, मागील संचालकांच्या कारभाराविषयी श्वेतपत्रिका काढणार असल्याचे म्हटले आहे. यासंबंधी बोलताना वरुटे म्हणाले, ‘त्यांनी जरुर चौकशी करावी, श्वेतपत्रिका काढावी, आम्ही त्याचे स्वागतच करतो. मागील सात वर्षात संचालक मंडळाने काटकसरीचा कारभार करुन सभासदांना समाधानकारक व्याज व लाभांश दिला होता. कर्जावरील व्याजदर दहा टक्क्यापर्यंत खाली आणला.”
पत्रकार परिषदेला माजी चेअरमन स्मिता डिग्रजे, राजमोहन पाटील, बजरंग लगारे, अरुण पाटील, दिलीप पाटील, जी. एस. पाटील, नामदेव रेपे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.