![](_MaharashtraNews1/u/pos/202404/1000184494--800.jpg)
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकत नाही, हा स्वाभिमान पुन्हा एकदा शाहू महाराज यांनी आपल्या उमेदवारीने दाखवून दिले" असे उद्गगार शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी काढले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचा भुदरगड तालुक्यातील विविध गावात प्रचार दौरा झाला. वाघापूर, कूर, मिणचे खुर्द, आकुर्डे, कडगाव, अनफ, तांबाळे, वेसर्डे या गावात प्रचार मेळावे झाले. या प्रचार मेळाव्यातून पाटगाव धरणातील पाणी अदानी ग्रुपच्या प्रकल्पासाठी देण्याला ठाम विरोध राहील असा इशारा साऱ्यांनी दिला. या सभेदरम्यान आमदार कपिल पाटील यांनी शाहू छत्रपतींची भेट घेतली. याप्रसंगी साहित्यिक राजन गवस सोबत होते. आमदार पाटील यांनी समाजवादी गणराज्य पार्टीचा पाठिंबा जाहीर केला. दरम्यान या सभेत शिवसेना शिंदे गटाचे वेंगरुळ येथील कार्यकर्ते संदीप देसाई व मेघोली येथील कार्यकर्ते सागर राऊळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार कपिल पाटील म्हणाले, ‘देशात अनेक राजे-महाराजे झाले. मात्र सध्य स्थितीत समाजहित, देशहितासाठी कणखर भूमिका घेणारे शाहू छत्रपती एकमेव आहेत. कोल्हापूरच्या संस्थानबद्दल अपार श्रद्धा आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा लोकाभिमुख कारभार, धोरणे हा संविधानातील सगळा मूलभूत गाभा आहे.शाहू छत्रपतींच्या या उमेदवारीला अनेक अर्थ आहेत. समता, संविधान आणि लोकशाहीच्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत. हे रयतेचे राज्य आहे, रयतेच्या हाती राहील असा संदेश सर्वत्र पोहोचला. या निवडणुकीत समाजातील सगळे घटक शाहू छत्रपतींना समर्थन देत आहेत. त्यामध्ये शिक्षक ही मागे असणार नाहीत.’
भुदरगड तालुका काँग्रेस अध्यक्ष शामराव देसाई म्हणाले, ’ शाहू छत्रपतींची उमेदवारी ही आमच्यासाठी अभिमानाची आहे. २५ वर्षानंतर काँग्रेसच्या हात या चिन्हावर बटण दाबण्याची संधी मिळाली आहे. या निवडणुकीत शाहू छत्रपती हे पाच लाख मतांनी निवडून येतींल.’बिद्री
कारखान्याचे संचालक सत्यजित जाधव म्हणाले, ‘शाहू छत्रपती हे कोल्हापूरची अस्मिता आहेत. त्यांच्याविषयी बोलताना विरोधकांनी भान ठेवावे.विद्यमान खासदार संजय मंडलिक हे एकदाही या भागात फिरकले नाहीत. या निवडणुकीत जनतेनेच शाहू छत्रपतींना विजयी करण्याचे ठरविले आहे.’
शाहू छत्रपती म्हणाले, “काँग्रेस पक्ष हा स्वातंत्रलढयापासून देशसेवेत आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची पायाभरणी केली. ६५ वर्षात प्रचंड विकास साधला. गेल्या दहा दहा वर्षात देशाचा विकास झाला हा भाजपाचा दावा खोटा आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जिल्हयाच्या
विकासासाठी जबाबदारीने काम करू. लोकांसाठी सदैव उपलब्ध राहू.’ व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, एन.के. देसाई, कुंडलिक तळप आदी उपस्थित हाते. शहाजी देसाई यांनी प्रास्ताविक केले.