कोल्हापूर : "जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आदर्श जीवन जगण्याचा संस्कार सारस्वत बोर्डिंगने विद्यार्थ्यांच्या अंगी रुजविला आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देताना शिस्त आणि संस्काराचे धडे दिले. माणुसकी हाच धर्म याची शिकवण दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या होस्टेलने सर्व धर्मीयातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी निवासाची एकत्रित सुविधा निर्माण करुन जातिभेद तोडण्याचे मोठे सामाजिक कार्य केले."असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी काढले.
दसरा चौक येथील श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृहाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी (२१ मे) मोठ्या उत्साहात झाला. संस्थेच्या सारस्वत भवन येथे झालेल्या या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर, सचिव सुधीर कुलकर्णी सहसचिव अमित सलगर, संजय वाघापूरकर, गजानन आसगेकर, धनंजय देशपांडे, सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर, उपाध्यक्ष संजीव बोरकर, सचिन शानभाग, संस्थेच्या माजी अध्यक्ष डॉ. यशस्विनी जनवाडकर, संस्थेचे कर्मचारी संजय भोपळे कन्हैया मोरे महादेव गोपाळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या ७५ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मनोहर भिडे, किशोर सातोसकर यांचा समावेश आहे. संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुबाळ यांचा सत्कार केला.
संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर म्हणाले, "सारस्वत विद्यार्थी वसतिगृहाला १०८ वर्षांची मोठी परंपरा लाभलेली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून ते आजअखेर गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सारस्वत समाजाने केले आहे. बोर्डिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसह विद्यार्थी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, गरजू विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, शिक्षण सहाय्य योजना, संशोधनासाठी व परदेशी शिक्षणासाठी अर्थसहाय अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध योजना आखले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देता यावा म्हणून इमारतीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे."
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुबाळ माळी हे प्रास्ताविकात म्हणाले, "सारस्वत बोर्डिंग म्हणजे शिस्त संस्कार व गुणवत्तेचा मिलाप आहे. होस्टेलने विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी घडवले. जात धर्म बाजूला ठेवून समाजातील हुशार गरजू मुलांना प्रवेश देऊन सुसंस्कारित पिढी घडवणारे होस्टेल म्हणून सारस्व बोर्डिंगची ओळख आहे. माजी विद्यार्थी संघटनेचा हा तिसरा मेळावा आहे. भविष्यात अधिकाधिक माजी विद्यार्थी संघटना व संस्थेची जोडले जातील यासाठी प्रयत्नशील राहू. कृतज्ञतेचा भाव म्हणून प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी संस्थेसाठी सहकार्य करावे."
अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी होस्टेलच्या प्रगतीसाठी प्रशासकीय पातळीवर मदत करण्याची ग्वाही दिली. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून स्नेहमेळाव्याचे उद्घाटन झाले. संस्थेचे माजी विद्यार्थी तुळशीदास हसबनीस, विनायक कुलकर्णी, बाबासाहेब पाटील, विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना पुस्तक भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी होस्टेलचा विद्यार्थी सौरभ पाटीलने मनोगत व्यक्त केले. आनंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर कुलकर्णी यांनी आभार मानले.